Sunday, January 19, 2020

अनब्रेकेबल





अनब्रेकेबल

                             एम.सी.मेरी कोम


आपल्या देशाच्या कोणत्याही गावात,शहरात,राज्यात,भागात जा तिथे मुलीचा जन्म म्हणजे बाप्पाच्या पाठीवरचं एक अनामिक ओझं समजलं जातं.पण याच मुली जेव्हा घरच्या करत्या होतात, आई-बाप्पाचं स्वप्न पुर्ण करतात, संपुर्ण घराला सांभाळतात तेव्हा त्या ओझं नसतात तर त्या घराचा आणि बाप्पाचा अभिमान असतात. त्यामुळे मुलींना ओझं समजण्याची चुक करू नका.

२४ नोव्हेंबर १९८२ साली मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यातील सागंगा खेड्यात अशाच एका मुलीचा जन्म झाला आणि त्या मुलीने जगाला दाखवुन दिल कि मुलींना ओझं म्हणण्याची चुक करू नका. ५.२" फुट उंचीच्या या रणरागिणीने भारतीय महिला बॉक्सिंगला जगामध्ये मानाचे स्थान मिळवुन दिले. एक अतिसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या  सामान्य मुली पासुन ते अनब्रेकेबल बॉक्सर पर्यंतचा तिचा प्रवास हा अत्यंत खडतर होता. मणिपुर सारख्या दुर्गम भागातुन पुढे येऊन संपुर्ण जगामध्ये आपल्या नावाचा डंका करणारा तिचा हा प्रवास तिचे आत्मचरित्र अनब्रेकेबल या १६० पानाच्या पुस्तकामध्ये मांडला आहे. पुस्तकाचे मराठी अनुवाद लेखीका विदुला टोकेकर यांनी केले आहे.

मित्रहो आज मी तुमच्या भेटीस एक असे पुस्तक घेऊन आलो आहे ज्याने सर्व क्षेत्रामधील मुला-मुलींना आणि सर्वच लोकांना ते प्रेरणादायी ठरेल. मी बोलत आहे एम सी मेरी कॉम हिच्या अनब्रेकेबल या आत्मचरित्र पुस्तकाबद्धल.  गरीब कुटुंबामध्ये वाढलेली मेरी घरामधील सर्वात मोठी मुलगी. आपल्या वडिलांना ती प्रत्येक कामामध्ये मदत करायची. जणु तिच्या वडिलांचा उजवा हाताचं. आपल्या वडिलांकडुन मिळालेल्या कष्ट करण्याची आणि मेहनत करण्याची शिकवण. त्याच्या  जोरावर आपण आपल्याला हवते साध्य करू शकतो या विश्वासावर मेरीने १९९९ मध्ये इंफाळ मध्ये बॉक्सिंग क्षेत्रामध्ये करियर करायचे या हेतुने प्रवेश केला. मणिपुर सारख्या अशांत भागामध्ये रहाणे आणि आपले इच्छित सध्या करणे साधी गोष्ट नव्हती. पण तिने हे साध्या केले तिच्या इच्छा शक्तीच्या जोरावर. सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन असणाऱ्या एम.सी.मेरी कॉम हिचा प्रवास वाचुन मन प्रभावीत होऊन जाते. मेरीच्या या प्रवासामध्ये तिला खुप लोकांनी साथ दिली, मदत केली. त्या लोकांमध्ये प्रामुख्याने तिचे आई-वडील,सासु-सासरे कुटुंबीय. पण एका व्येक्तीचे नाव इथे आवर्जून घेतले पाहिजेल. असं म्हणतात कि एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. पण मेरीच्या या यशस्वी प्रवासामध्ये तिला मोलाची साथ मिळाली तिच्या पतीची ऑन्लर ची. मेरी ने तिच्या करियरवर जास्त लक्ष द्यावे आणि बॉक्सिंग सोडु नये यासाठी तो तिला वेळोवेळी मार्गदर्शन करत असे. मेरी आणि ऑन्लर या दोघांच्या भेटीचे एक प्रकरण या पुस्तकामध्ये आहे ते वाचते वेळी हे दोघे एकमेकांसाठीच बनले आहेत असं समजत.

पुस्तकांमधील काही विशेष गोष्टी मनाला प्रभावीत करतात त्या म्हणजे मेरीने मिळवलेले पहिले आंतरराष्ट्रीय पदक,त्यासाठीची तिने घेतलेले कष्ट. त्यानंतरचा तिचा प्रवास,स्पर्धांसाठी,प्रशिक्षण शिबिरांसाठी स्व खर्चाने जाणे त्यासाठी पैसे कसे जमवावे लागले, घरापासुन पतीपासून दुर रहावं लागलेले क्षण. आणि त्यानंतर मणिपुर हे किती अशांत आहे याचे दर्शन. मेरीच्या सासऱ्यांचा झालेला खुन.  त्यामुळे अशांत झालेल्या आपल्या पतीला धीर देऊन त्याला वाईट विचारानं पासुन परावृत्त करू आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करणारी मेरी या गोष्टींमुळे हे पुस्तक वाचकाच्या मनामध्ये त्याचे विशेष स्थान मिळवते.

जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अशक्य वाटणाऱ्या पुनरागमनासाठी मेरीने घेतलेली अखंड मेहनत. पुनरागमन केल्या नंतर तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. त्यानंतर तिच्यावर खुप टीका झाली, खुप लोकांनी आणि तिच्या वडिलांनी तिला थांबण्याचा सल्ला दिला होता. पण मेरीला त्याकाळामध्ये मोलाची साथ दिली ते तिच्या पतीने ऑन्लरने.

पुस्तकांमधील अजुन एक भाग विशेष आहे तो म्हणजे मेरीने मिळवलेले ऑलंम्पिक्स खेळामधील कास्य पदक. या पदकासाठी तिने घेतलेली विशेष मेहनत आणि त्याच्यासाठी तिला विशेष आंतराराष्ट्रीय प्रशिक्षक लाभले जे बॉक्सिंग सारख्या खेळमध्ये मिळणे खुप अवघड असते. या प्रकरणामध्ये मेरीने एक महत्वपुर्ण गोष्ट वाचनाच्या समोर आणली आहे ती म्हणजे ऑलम्पिक,एशियन गेम्स, यासारख्या स्पर्धां मध्ये खेळाडुने कास्य पदक किंवा रौप्य पदक मिळवले तर भारतामध्ये खुप जल्लोष केला जातो, पण सर्वानी हे लक्षात घेतले पाहिजेल कि ते पदक हे हरलेलं पदक असतं. कारण यासारख्या खेळांमध्ये सुवर्ण पदक हे जिकंलेले पदक असतं.  

भारतामध्ये क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडुला सहज प्रायोजक मिळतात,चांगल्या सुविधा मिळतात, नाव मिळत. पण इतर खेळामधील खेळाडूंच्या वाट्याला हे येत नाही. फुटबॉल,हॉकी,कबड्डी,कुस्ती,बॉक्सिंग या खेळांना भारतामध्ये अजुन पण क्रिकेट नंतरचे दुय्यम स्थान दिले गेले आहे. पण मेरी कॉम ने तिच्या खेळामध्ये यासाऱ्या गोष्टींना बगल दिली आहे आणि दाखवुन दिले आहे कि तुमची इच्छा शक्ती मोठी असेल आणि तुमचा तुमच्या कामावर विश्वास असेल तर आपण संपुर्ण जगाला आपल्या पायाशी अनु शकतो.

ओलम्पिकस गेम्समधील पदक विजयानंतर मेरीचे संपुर्ण आयुष्य बदलुन गेले.तिने महिला बॉक्सिंगला भारतामध्ये आणि जगामध्ये मानाचे स्थान मिळवुन दिले. प्रत्येकाने प्रेरणा घ्यावे असे हे पुस्तक. मला विश्वास आहे कि मेरीचे हे आत्मचरित्र प्रत्येकाला प्रभावीत करेल.  पुस्तकाचे प्रकाशन मंजुल पब्लिशिंग हौसने केले आहे. प्रत्येक वाचकाने जरूर वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही हे पुस्तक असलेच पाहिजेल. एक आत्मचरित्र अनब्रेकेबल एम.सी.मेरी कोम.  


श्रीजीवन तोंदले

No comments:

Post a Comment

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.