Sunday, August 9, 2020

जाणतेपण ते झपाटलेपण अनुभवायचं असल्यास प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी ही कादंबरी रणजित देसाई लिखित 'राधेय'.


   

राधेय

                     लेखक -  रणजित देसाई


रणजित देसाई लिखित 'राधेय' ही  कर्णाच्या आयुष्याचा वेध घेणारी कादंबरी. कर्ण हे महाभारतातील एक महत्वाचं पात्र. सगळ्यांनाच कर्णाच्या आयुष्याबद्दल कुतूहल वाटत आणि त्या कुतुहलापोटीच ही कादंबरी वाचनात आली. हे पुस्तक म्हणजे 'कर्णचरित्र' नव्हे तर, आपल्या सगळ्यांच्याच मनात असलेल्या "त्या" एका कर्णाची ही कहाणी. भावकहाणी.  हे लेखकाने कादंबरीच्या सुरूवातीलाच स्पष्ट केले आहे, आणि ते अगदी तंतोतंत खरे आहे, याचा प्रत्यय आपल्याला पुस्तक वाचताना पदोपदी येतो..

कर्ण जन्माने जरी कुंतीपुत्र असला तरी तो त्याच्या कर्माने श्रेष्ठ ठरला.त्याच्या कर्मानेच तो सर्वत्र ओळखला गेला.म्हणूनच त्याला कौंतेय न म्हणता राधेय असं म्हटलं आहे.सर्वच अभ्यासक,साहित्यिक,जाणकार मंडळी असं म्हणतात की,कर्ण जर मोठा झाला असता तर तो कुणालाही मानवाला नसता, ह्या वाक्याची गंभीरता वाचताना आपल्याला जाणवत राहते.चांगल्या ठिकाणी मिळालेली हीन वागणूक किंवा वाईट ठिकाणी मिळालेली चांगली वागणूक यामुळे माणसं घडतात.आता यात कोण चांगलं कोण वाईट हा वादाचा मुद्दा होऊ शकतो, पण कर्ण हा त्याला जीवनात आलेल्या अशाच काही चांगल्या वाईट अनुभवांमुळे घडत गेला आहे. आणि म्हणूनच परिस्थितीने कर्णाला घडविले आहे असं वाटतं.

कर्णाचे पराक्रम,त्याची निष्ठा,त्याची मैत्री मग ती कृष्णासोबतची असो किंवा दुर्योधनासोबतची तो सदैव जपत आला, त्याच बरोबर त्याची तत्वे, झालेले अपमान,त्याच्या चुका आणि त्यासाठीचे प्रायश्चित्त या सगळ्यांना धैर्याने सामोरा जात राहिला, पुस्तक वाचताना या सगळ्या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात.त्याच्या जन्माबरोबच सुरु झालेल 'जगण्याचं कोडं' तो आयुष्यभर सोडवण्याचा प्रयत्न करीत राहिला, हे पुस्तकातील अनेक प्रसंग वाचताना प्रत्ययास येते. लेखकाने प्रत्येक प्रसंगाचे वर्णन अतिशय सुंदर पद्धतीने केले आहे. प्रत्येक स्थळ, प्रसंग, घटना अक्षरशः डोळ्यांसमोर उभी राहते.

"स्वयंवराचा दिवस उजाडला. नगराच्या ईशान्येला सभामंडप उभारला होता. प्रवेशद्वारी गगनाला भिडलेले गोपुर उभे केले होते.रत्नांकीत सुवर्णासनांनी, तोरणांनी सभास्थान अलौकिक बनले होते!

अशाप्रकारे स्वयंवर स्थळाचे अत्यंत बारकाईने केलेले चोख वर्णन असो वा युद्धानंतर कुरुक्षेत्रावरील भीषण परिस्थितीचे वर्णन असो;

"कुरुक्षेत्राची विस्तीर्ण, विशाल रणभूमी उदास, उजाड वाटत होती. आकाशी सूर्य तळपत असूनही त्या भूमीचे तेज ओसरले होते. जय- पराजयाचा अर्थ तर केव्हाच संपला होता. रणांगणावर छाया फिरत होती अतृप्त गिधाडांची!" वाचक ती परिस्थिती तंतोतंत अनुभवतो.

आपल्यातलाच कर्ण जणू त्याची कथा(की व्यथा?) सांगू लागतो, ही आपल्यातल्याच कर्णाची कहाणी आहे, असेच सतत वाटत राहते. त्याची सत्यता-असत्यता तपासायची असल्यास ज्याने त्याने ती नक्कीच तपासावी, ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. वाचताना आपण अनेकदा चरफडतो, चिडतो, हताश होतो, दुःखी होतो, प्रसंगी पेटून उठतो आणि शेवटी शांत होतो , आत्ममग्न होतो.

पुस्तक मिटून आपल्यातल्या कर्णाला मिठीत घेऊन शून्यात बघत राहतो;हेच लेखकाचं आणि या कादंबरीचं मोठेपण आहे. 

'मेहता पब्लिशिंग हाऊस' यांनी या कादंबरीचे प्रकाशन केले आहे.कर्णाची भावकहाणी सांगणारी 263 पानांची ही कादंबरी प्रत्येक पुस्तकप्रेमीच्या अवश्य संग्रही असावी अशी आहे.

जाणतेपण ते झपाटलेपण अनुभवायचं असल्यास प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी ही कादंबरी रणजित देसाई लिखित 'राधेय'.

 


अजिंक्य भोसले 

पुणे 

Sunday, August 2, 2020

जेष्ठ साहित्यिक आणि थोर सामाजिक कार्यकर्ते, लेखक डॉ.भीमराव गस्ती त्यांच्या संघर्षांची गाथा सांगणारे पुस्तक.





बेरड

                                 लेखक - भीमराव गस्ती

 

 

पिढ्यान् पिढ्या होत असलेल्या अन्याया विरोधात आवाज उठवणं आणि त्यासाठी एखादी संघटना उभा करून न्यायासाठी,आपल्या हक्कासाठी, आपल्या लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी विविध कार्यक्रम राबवणे,चळवळ उभी करणे ही काही साधी गोष्ट नसते.ज्या लोकांच्या हक्कांसाठी लढा द्यायचा,त्याच लोकांनी आपल्या जीवावर उठायच; मग हा उभारलेला लढा कोणासाठी आणि कशासाठी...?

 

नमस्कार मंडळी, आज एका संघर्षांची गाथा सांगणारे पुस्तक घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे. हा संघर्ष एका लढवय्याचा आहे. हा लढवय्या आपल्या जातीवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध लढला. पण प्रसंगी त्याच्या वाट्याला निराशा आली,तर कधी ज्यांच्यासाठी तो लढला तेच त्याच्या जीवावर उठले. मी बोलत आहे जेष्ठ साहित्यिक आणि थोर सामाजिक कार्यकर्ते, लेखक डॉ.भीमराव गस्ती यांचे आत्मचरित्र 'बेरड' या पुस्तकाविषयी. ही कथा आहे, बेरड जातीमध्ये जन्मलेल्या भीमराव गस्ती यांची आणि त्यांच्या शोषित आणि दुर्बल जातीवर होणाऱ्या अन्यायाची. त्यांच्या जातीतील लोकांना प्रतिष्ठा मिळावी, त्यांच्याकडे माणुसकीच्या नात्याने सर्वांनी बघावं म्हणून भीमराव गस्ती यांनी दिलेल्या लढ्याची,पोलिसांकडून होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध पुकारलेल्या एकाकी लढ्याची आणि या लढ्यामध्ये त्यांना आलेल्या अनुभवांची. त्यांचे या प्रवासातील अनुभव,वाट्याला आलेल्या यातना या  पुस्तकाचं वाचन करताना वाचकाला अंतर्मुख करतात.

 

 बेरड या जातीला खूप जुना इतिहास आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पेशवाई ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा या लोकांचा सहभाग होता. स्वामिनिष्ठ असणाऱ्या या जातीतील लोक, इंग्रज सरकारच्या अत्याचाराला, त्यांच्याकडून होणाऱ्या अतोनात छळाला कंटाळून हे लोक जंगलामध्ये वास्तव्यास आले. पोटाची भूक मिटवण्यासाठी हे लोक छोट्या छोट्या चोऱ्या करू लागले. पुढे त्यांच्याकडे चोर-दरोडेखोर म्हणूनच लोक बघू लागले.दारिद्र्याने होरपळलेल्या या लोकांच्या आयुष्याला पोलिसांकडून होणारे अत्याचार जन्मापासूनच लागले. हीच गोष्ट लेखकाच्या वाट्याला आली. शाळेत नेहमी कुठेही चोरी झाली की भीमराव गस्ती यांनाच शिक्षा व्हायची. त्यांच्यावर होणारे हे अत्याचार ते निमूटपणे सोसत होते. कधी हरामखोर तर कधी दरोडेखोर म्हणून त्यांना हिणवले जायचे.

 

हैद्राबादवरून उच्च शिक्षण पूर्ण करून परतलेले लेखक गस्ती यांच्या समोर एक घटना घडते. आपल्या जातीतील लोकांना कायम स्वरूपी काम मिळावे म्हणून ते आंदोलन करतात. आणि इथून त्यांच्या समाजकार्याची वाटचाल सुरु होते. बेरड लोकांची संघटना उभी करून आपल्या लोकांच्या हक्कासाठी ते संघर्ष करतात. एखादी संघटना उभी करणे,ती चालवणे, त्यासोबत आपल्या समाजाच्या मागण्या विविध परिषदांच्या मार्फत लोकांसमोर मांडणे हे काही सरळ सोपे काम नव्हते. पण लेखक डॉ.भीमराव गस्ती यांनी एकट्यानेहा सर्व संघर्ष केला. समाज्याच्या प्रत्येक स्तरावरून त्यांना विरोध झाला. हा विरोध अगदी त्यांच्या जातीतील लोकांनी सुद्धा केला. पण शिक्षणाने आणि थोर मंडळींच्या विचारांनी समृद्ध झालेले लेखक गस्ती यांनी विरोधाला विरोध कधीच केला नाही. त्यांनी नेहमी स्वतःचा वेगळा मार्ग शोधला आणि आपल्या समाजामध्ये जनजागृतीचे काम चालू ठेवले. त्यामध्ये प्रामुख्याने बेरड समाजातील लोकांना अंधश्रद्धा,रूढी परंपरायांच्या दलदलीतून बाहेर काढले,देवदासी प्रथा बंद व्हावी यासाठी सुद्धा त्यांनी चळवळ सुरू केली.

 

MSC Electronics शिक्षण झालेल्या लेखक डॉ. भीमराव गस्ती यांनी DRDO मध्ये शास्त्रज्ञ म्हणून कामही केले होते. अशा या उच्चशिक्षित अवलियाने आपल्या बेरड समाजाच्या उन्नतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. पण या सगळ्यात त्यांचे त्यांच्या घराकडे,आई-वडिलांकडे,संसाराकडे दुर्लक्ष झाले. त्यांना आलेले काही अनुभव वाचताना मन अक्षरशः पिळवटते. पोलिसांकडून झालेला छळ हा वाचकांच्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि डोळ्यातून नकळत पाणी येते. पुस्तकाच्या शेवटी एका बेरड तरुणाच्या निर्घृण खुनाची कथा लेखकाने सांगितली आहे आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी लेखकाने केलेला आटापिटा आणि त्यांना आलेले अनुभव वाचून मन सुन्न होते.

 

पुस्तकाचे प्रकाशन 'राजहंस प्रकाशनने' केले आहे. राजहंस प्रकाशनाचे नाव घेताच वाचकाला आपोआपच पुस्तकाच्या उत्तम दर्जाची शाश्वती मिळते. वाचकांना उत्तमोत्तम पुस्तके वाचायला मिळावीत म्हणून ते नेहमीच प्रयत्नशील असतात. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि पुस्तकांमधील चित्रे अनिल दाभाडे यांनी साकारलेली आहेत. एका संघर्षाची गाथा सांगणारे हे पुस्तक प्रत्येक वाचकाने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे पुस्तक साहित्यिक,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,लेखक डॉ. भीमराव गस्ती लिखित 'बेरड'.