Wednesday, February 19, 2020

बुद्धीच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी केली बलाढ्य अफझलखानावर मात.






लक्षवेध
                            लेखक -रणजित देसाई

आज पर्यंत शिवचरित्र खुप वेळा वाचले. नुसतं वाचलं नाही तर त्याचे जणु पारायण केले. शिवचरित्र म्हणजे अखंड आदिम महासागर. ओंजळ भर काढले काय आणि हंडा भर काढले काय तरीही कमीच वाटणारे. त्यामधील प्रत्येक घटना,प्रत्येक प्रसंग म्हणजे एक स्वतंत्र पुस्तकच. संपुर्ण शिवचरित्र हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणा देणारे स्रोत. शिवरायांचा जन्म, आपल्या सवंगड्यां सोबत रोहिडेश्वराला साक्ष ठेऊन हिंदवी स्वराज्याची घेतलेली शपत, सोळाव्या वर्षी घेतलेला तोरणा गड, अफझलखाणाच्या रूपाने स्वराज्यावर आलेलं सर्वात मोठं संकट, पावनखिंडीतील शौर्य गाथा, महाराजांची आग्रयाहून सुटका,  स्वराज्यामध्ये परत मिळवलेला कोंडाणा किल्ला(सिह गड) या आणि अशा किती तरी घटनांनी शिवचरित्र हे एक अखंड,आदिम महासारग बनलं आहे. म्हणुन वर म्हंटल्या प्रमाणे ओंजळ भर काढलं काय आणि हंडा भर काढलं काय तरीही ते कमीच वाटावं.

आपल्या महाराष्ट्रामध्ये  आणि मराठी साहित्यविश्वामध्ये खुप इतिहासकार होऊन गेले आणि होत आहेत. प्रत्येक जण आपल्यापरीने शिवचरित्र लोकांसमोर मांडत आहेत. त्याचा प्रसार करत आहेत. आज पर्यंत खुप इतिहासकारांनी शिवरायांचा इतिहास कादंबरीच्या माध्यमातुन मांडला त्यामध्ये प्रामुख्याने नाव घ्याचे तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे. सोबतच एक नाव आवर्जुन घावे ते म्हणजे स्वामीकर रणजित देसाई यांचे.लेखक रणजित देसाई यांच्या लेखणीने अजरामर केलेल्या ऐतिहासिक कादंबरी स्वामी,राधेय,पावनखिंड,लक्ष्यवेध या कादंबरी वाचते वेळी आपण त्यानुसत्या वाचत नाही तर त्या अनुभवतो आहे असा भास होतो.  श्रीमानयोगी या कादंबरी द्वारे संपुर्ण शिवचरित्र वाचकांन समारो उभे केले. ते वाचते वेळी आपण त्या प्रत्येक क्षणांचे साक्षीदार आहोत असाच भास होत रहातो. कथे मधील बारकावे, घडणाऱ्या घटने सोबत प्रसंगांची निर्मिती, परिस्थीचे आणि अजु बाजुच्या परिसराचे वर्णन,  कथे मधील पात्रांचे वर्णन येवढेच काय तर त्या पात्रांच्या पोशाखाचे वर्णन हे सुद्धा वाचुन मन भरून जाते. एकदा वाचायला सुरु केलेली कादंबरी संपवल्या शिवाय खाली ठेवुस वाटत नाही. लेखक रणजित देसाई यांच्या लेखणी विषयी बोलावे आणि लिहावे तेवढे कमीच आहे. म्हणुन थोडं थांबतो इथे.

तर मित्रहो आज १९ फेब्रुवारी आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. या जयंती निमित्य आदिम महासागर असणाऱ्या शिवचरित्रामधील एक महत्वाची घटना, ज्याने शिवरायांच्या आणि हिंदवी स्वराज्याच्या प्रवासाला मिळालेलं एक यशस्वी वळण. ती घटना म्हणजे अफझलखानचा वध. या प्रसंगावर आधारीत कादंबरी लेखक रणजित देसाई लिखित लक्षवेध हि कादंबरी घेऊन  मी तुमच्या भेटीला आलो आहे.  या आधी खुप पुस्तकं विषयी लिहिलं,  मुळ कथेचा गाभा किंवा मुळ कथेचा उलघडा न करता पुस्तकाचा परिचय आपल्या समोर मांडला आणि मांडत आलो,  त्यावेळी उद्धेश एकच होता कि तुम्ही ते पुस्तक वाचावे आणि तुम्हाला ते पुस्तक वाचावयास भाग पाडणे. पण यावेळी मी थोडा संकटात आहे कारण आता जे पुस्तक घेऊन मी तुमच्या भेटीला आलो आहे त्याची कथा तर तुम्हाला आधी पासुन माहिती आहे. किंबहुना ती कथा आपल्याला इयत्ता चौथी मध्ये शिकवली आहे. मग तुम्ही म्हणाल हि घटना आम्हाला आधी पासुन माहिती आहे मग आम्ही हे पुस्तक का वाचु ...?

तर मंडळी या प्रश्नच उत्तर मी असं देईन कि ऐतिहासिक घटनांची मांडणी करताना किंवा इतिहास सांगताना मुळ कथेला धक्का न  लावता, मुळ कथेला पुर्ण पणे न्याय देऊन, सर्व घटनांचा तपशील त्यांच क्रम योग्ये प्रमाणे मांडावा म्हणजे मुळ इतिहास हा लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहचतो. घडलेली घटना पुढच्या पिढीला सांगताना त्यामध्ये काही कमी जात होतं पण ते किती कमी आणि किती जास्त करायचं हे त्या इतिहासकाराला, त्या लेखकाला यांची जाणीव असावी. आणि हिच जाणीव लेखक रणजित देसाई यांना आहे.  त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक अत्यंत प्रभावी आहे.  अफझलखानचा वध हि मुळ घटना असली तरी त्यासोबतची पार्श्वभुमी त्यांच्या सोबतच्या इतर घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई मातोश्री यांचा आजाराने झालेला मृत्यु. त्यावेळी शिवरायांची झालेली मनःस्तिथी हि ज्याप्रकारे लेखकानी  मांडली आहे ती वाचतेवेळी डोळ्यात पाणी येते. बलाढ्य शक्ती असलेल्या अफझलखानाला शिवरायांनी बुद्धीच्या जोरावर मात दिली या संपुर्ण घटनेचा घटना क्रम वाचते वेळी उर अभिमानाने भरून येते आणि न कळत तोंडातुन शब्द येतात शक्ती पेक्षा युक्ती क्ष्रेष्ठ. यासर्व गोष्टींसोबत कथेमध्ये येणाऱ्या इतर व्यक्ती रेखा म्हणजे जीव महाला,संभाजी कावजी, महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ,कृष्णाजी भास्कर,सय्यद बंडा या आणि इतरांचे केलेले वर्णन वाचते वेळी यासर्व व्यक्ती रेखा डोळ्या समोर उभ्या रहातात. अफझलखानचे केले वर्णन वाचुन अफझलखान किती शक्तिशाली होता याचा अनुभव येतो. मडंळी या पुस्तकांमधील अशा खुप गोष्टी आहेत ज्यांच्या विषयी बोलावे तेवढे कमी आहे. माझ्या मते तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला मी योग्य उत्तर दिला आहे. आणि माझ्या या उत्तराने तुमचे समाधान झाले नसेल तर हि कादंबरी तुम्ही नक्की वाचा. मंडळी मी या कथेचा मुळ गाभा सांगितलंच नाही आणि तो कोणता माहिती आहे......मग तर हे पुस्तक तुम्ही वाचलेच पाहिजेल. मुळात मंडळी हे पुस्तक १३५ पानाचे आहे. आणि हे मी पुणे ते कोल्हापुर या साडेपाच तासाच्या प्रवास मध्ये वाचुन पुर्ण केले आहे.

पुस्तकाचे प्रकाशन मेहता पब्लिकेशन हाऊस यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी साकारले आहे. अत्यंत वाचनीय आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही हे पुस्तक असलेच पाहिजेल. प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक स्वामीकर लेखक रणजित देसाई लिखित लक्षवेध.

 आता तर टीव्ही मालिकांमधुन, सिनेमांमधुन शिवचरित्र दृश्य स्वरूपामध्ये लोकांसमोर मांडले जात आहे. यागोष्टीचा खुप अभिमान वाटतो. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तळागाळातीलच नव्हे तर संपुर्ण विश्वातील, प्रत्येक स्थरामधील लोकांना तो समजत आहे. माझा राजा हा नुसता राजा नव्हता तर तो जनतेचा राजा होता, म्हणुन लोक त्यांना जाणता राजा म्हणतात. माझी इच्छा फक्त एवढीच आहे. शिवरायांचा इतिहास पद्यावर मांडते वेळी प्रत्येक दिग्दर्शकाने आणि लेखकाने एकदा तरी रणजित देसाई यांनी लिहिलेल्या मी वरती नमुद केलेली सर्व पुस्तके वाचावे. म्हणजे मुळ इतिहासाला धक्का न लावता तो लोकांसमोर कसा मांडावा याचे आकलन होईल.

जय शिवाजी जय भवानी.


श्रीजीवन तोंदले

Sunday, February 9, 2020

गजाआडच्या गोष्टी



गजाआडच्या गोष्टी

                        - सुनेत्रा चौधरी

असे म्हणतात कि शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढु नये आणि तुरुंगवास तर नकोच नको. या जगात सगळ्यात वाईट ठिकाण कोणत असेल तर ते  तुरुंग. मी पुण्यामधील येरवडा कारागृह किंवा  कोल्हापूरमधील कळंबा कारागृह यांच्या जवळुन म्हणजे तसं खुपच दुरून जात असतो तेव्हा मनात एक प्रश्न येतो कि  या भिंतींच्या पलीकडील जग कसे असेल...? आज पर्यंत सिनेमांमध्ये बघितलेले तुरुंगातील जग म्हणजे निल नितीन मुकेश याच्या जेल या सिनेमामध्ये बघितलेले तुरुंगातील जग किंवा  काल पर्वा Criminal Justice   या वेब सिरीयस मध्ये बघितलेलं तुरुंगातील जग हे खरे असेल का..?  तुरुंग हे गुन्हेगारी माणसांना माणुस बनवण्याचे ठिकाण असे म्हंटले जाते. काय खरंच त्या जागेत गुन्हेगारी माणुस हा माणुस बनतो....? या प्रश्नांची उत्तरे मला पत्रकार सुनेत्रा चौधरी लिखित गजाआडच्या गोष्टी या पुस्तकातुन मिळाली.

२७० पानांचे हे पुस्तक तुम्हाला तुरुंग याठिकाणा पासुन किती दुर राहील पाहिजेल हे शिकवते. तेरा लोकांच्या मुलाखती या पुस्तकामध्ये आहेत. असे लोक ज्यांना सामाज्यामध्ये एक वेगळं आणि प्रतिष्ठेचं स्थान होत. त्यामध्ये काही दिग्ज राजकारणी आणि ओद्योगपती सुद्धा आहेत आणि काही सामान्य लोकांचे तुरुंगातील त्यांचे अनुभव लेखिकेने नमुद केले आहेत. सुमारे २०१५-१६ या कालावधी पर्यंतच्या लोकांच्या मुलाखती यामध्ये आहेत. पत्रकार सुनेत्रा यांनी अत्यंत अभ्यासपुर्वक  घेतलेल्या मुलाखती या पुस्तकामध्ये मांडल्या आहेत.

दिग्ज राजकारणी लोकांवरील गुन्हे, त्यांच्या वाट्याला आलेला तुरुंगवास आणि त्यांना मिळालेल्या सवलती आणि त्यासोबतच त्यांच्या वरील खटल्याच्या सुनावणीचा काळ त्यावेळचे अनुभव या बद्धल लेखिकेने सखोल विश्लेक्षण केले आहे. त्यासोबतच  काही दिग्ज ओद्योगपती यांच्या वरील गुन्हे आणि त्यांच्यासाठी तुरुंगात केली जाणारी खैरात त्याबद्धल लेखिकेने उत्तम प्रकारे मत मांडले आहे. एका बाजूला या दिग्ज लोकांसाठी कायदा आणि तुरुंगातील  नियम कसे लवचीक  झाले याचे विश्लेषण करते वेळी सामान्य गुन्हेगारांसाठी कायदा आणि तुरुंगातील कायदे नियम कसे आणि किती कडक होते त्याबद्धल सुद्धा लेखिकेने उघड पणे सखोल विश्लेषण केले आहे.

खुशी नावाच्या लिंगपरिवर्तित नर्तकीवर पोलीस ठाण्यामध्ये केला गेलेला सामूहिक बलात्कार, वाहिद आणि अत्याचाराच्या नानाविध तऱ्हा,एका अमेरिकन मल्लूने भोगलेला तुरुंगवास या गोष्टी वाचले वेळी मनाला खुप वेदना होतात तर वयाच्या सत्तरीतही न्यायाच्या प्रतीक्षेत,एक दहशतवाद्यांची बायको या गोष्टी वाचुन मन सुन्न होते. दिल्ली मधील तंदुर मर्डर मधील आरोपीने त्याला झालेल्या शिक्षेनंतर त्याच्या कृत्याचा त्याला झालेला पश्चाताप व्येक्त केला आहे. यासारख्या ऐकुण १३ मुलाखती या पुस्तकामध्ये आहेत. यासर्व मुलाखती तुम्हाला भारतीय तुरुंगातील विश्व कसे भयाण आहे हे सांगेल.

तुम्ही जर १००० रुपयांची चोरी केली असेल तर हवालदार तुम्हाला जीव जाईपर्यंत बदडून काढील आणि कोंदट अंधाऱ्याकोठडी मध्ये डांबून टाकेल; पण जर तुम्ही ५५,००० कोटी रुपयांची लूट केली असेल तर ४०* ४० च्या प्रशस्त,चारचार ऐरकंडिशनर्स लावलेल्या, इंटरनेट,फॅक्स,मोबाईल यासारख्या सर्व अत्याधुनिक सोयीने युक्त असलेल्या खोलीत तुमच्या राहण्याची सोया केली जाते. त्यासोबत बूट पॉलीश,स्वयंपाक सारख्या सोयीनसाठी दहा लोकांचा ताफा तुमच्यासाठी राबत असेल. तुरुंग हे अशा प्रकारचे विश्व आहे हे सुद्धा कळुन येते.

प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक,विशेषतः तरुण पिढीने वाचावे हे असे पुस्तक गजाआडच्या गोष्टी. पुस्तकाचे प्रकाशन मंजुल पब्लिकेशन हाऊस ने केले आहे. प्रत्येकाच्या संग्रही हे पुस्तक असलेच पाहिजेल.


श्रीजीवन