Friday, April 10, 2020

आठवणींचा प्रवास










आहे मनोहर तरी
                                  
                          
        लेखिका - सुनीताबाई देशपांडे






असं म्हणतात की, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. हे आपल्याला इतिहसापासून चालत  आलेल्या अनेक उदाहरणांवरून दिसूनही येत. याचच आणखी एक उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील रसिकांचे आराध्य दैवत पु.ल.देशपांडे आणि त्यांच्या पत्नी सुनीता देशपांडे. पण अशा थोर व्यक्तिमत्वाबरोबर संसार करताना, त्यांच्या कार्यात सर्वतोपरी मदत करताना स्वतःच स्वतंत्र अस्तित्व हरवण्याचा धोकाही तितकाच मोठा असतो. सुनीताबाई मात्र याला अपवाद ठरल्या. पु.लं सारख्या थोर आणि प्रसिद्ध माणसासोबत सहजीवन व्यतीत करताना त्यांनी स्वतःच स्वतंत्र अस्तित्व आवर्जून जपलं आणि याच त्यांच्या अस्तित्वाची कथा सांगणारे पुस्तक म्हणजे  'आहे मनोहर तरी'. 

'आहे मनोहर तरी' या पुस्तकाच्या लेखिका जरी स्वतः सुनीता देशपांडे असल्या तरीही त्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच हे नमूद करतात की, 'हे पुस्तक म्हणजे काही माझे आत्मचरित्र नाही.' आयुष्याच्या उत्तरार्धात ज्या आठवणी त्यांच्या स्मरणात राहिल्या, ज्या घटनांना, प्रसंगांना त्यांना लिखित स्वरूप द्यावेसे वाटले अशा सगळ्या संमिश्र आठवणींना दिलेला उजाळा म्हणजे हे पुस्तक.

‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकात सुनीताबाईंनी अशा सर्व कटू-गोड आठवणी लिहिल्या आहेत, ज्यामुळे त्या माणूस म्हणून घडत गेल्या, ज्यामुळे त्यांना जीवनाकडे बघण्याचा नवा आणि समर्पक दृष्टिकोन मिळाला. पु.लंमुळे त्यांच्या आयुष्यात आलेली माणसे, त्यांच्याकडून आलेले अनुभव, त्यांनी केलेले समाजकार्य, सुप्रसिद्ध लेखकाची पत्नी म्हणून मिळणारा मान-सन्मान आणि त्याच बरोबर याबिरुदाखाली हरवत जाणारी स्वतःची स्वतंत्र ओळख आणि त्याच दुःखही त्यांनी व्यक्त केलं आहे.

सुनीता देशपांडे या स्वतः एक स्वतंत्र विचार असणारी, कवितांची आवड असणारी, उत्तम अभिनयगुण अंगी असलेली, कलेची जाण आणि आवड असलेली, गृहकृत्यदक्ष स्त्री होत्या, पण स्वेच्छेने त्यांनी पु.लं साठी स्वतःचे करियर बाजूला ठेऊन पु.लंना त्यांच्या कामात संपूर्ण सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आणि आयुष्यभर नेटाने सर्व शक्तीनिशी पार पाडला.

या २३९ पानांच्या पुस्तकात अनेकदा सुनीताबाईंच्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दलच्या तक्रारी वाचनात येतात, पण 'माझा बऱ्याचदा तक्रारीचा सूर लागतो. असे म्हणून ही बाब त्या स्वतःच मान्य करतात आणि यावरूनच पुस्तकाच्या 'आहे मनोहर तरी' या शीर्षकाची समर्पकता लक्षात येते. पु.लं विषयीच्या तक्रारी मांडताना त्यांच्याशिवाय जगण्याची निरर्थकताही त्या स्पष्ट करतात. पु.लं मधील 'मूलपण' जस त्यांना स्पर्शून गेलं तसेच या मूलपणामुळे त्यांना हवा असलेला मित्र या नात्यातून न मिळाल्याची खंतही त्या व्यक्त करतात. पु. लं च आणि त्यांच्या पत्नीचं अनोखं नातं जाणून घेण्यासाठी प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावं अस हे पुस्तक आहे.

सुनीताबाईंनी या पुस्तकात स्वतःच्या गुणांबरोबरच स्वतःचे स्वभावदोषही सांगितले आहेत. आयुष्यात केलेल्या चांगल्या कामांबरोबरच हातून झालेल्या चुकांचीही प्रांजळपणे कबुली दिली आहे. त्यांचा हा प्रामाणिकपणा कौतुकास्पद आहे. जुन्यापिढीच्या असूनही 'लग्न म्हणजे कृत्रिम बंधन.' ही आणि अशा प्रकारची आधुनिक विचार मांडणारी विधाने वाचकाला विचार करायला भाग पाडतात.
 
पुस्तकाचे प्रकाशन 'मौज प्रकाशन' यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ बाळ ठाकूर यांनी केले आहे. सुप्रसिद्ध लेखकाच्या गृहिणी आणि खऱ्या अर्थाने सहचारिणी असलेल्या पत्नीचा 'जीवन म्हणजे काय..?' या प्रश्नाचं उत्तर शोधणारा प्रवास अनुभवण्यासाठी  हे पुस्तक नक्की वाचा!!!






अपूर्वा सपकाळ 
 पुणे 



Monday, April 6, 2020

भारतीय गुप्ताचरसंस्थेची बखर रॉ (भारताच्या गुप्ताचरसंस्थेची गूढगाथा)







                रॉ(भारताच्या गुप्ताचरसंस्थेची गूढगाथा)

                                                        लेखक  - रवि आमले



प्रत्येक  युद्ध हे युद्ध भूमीवरच  लढल जात असं नसत कारण काही युद्ध ही शत्रूशी  समोरासमोर लढताही जिंकता  येतात. जगाच्या इतिहासामध्ये  अशा किती तरी लढाया झाल्या आहेत. एका राजाचे राज्य हे केव्हा बलाढ्य होते किंवा त्याची संरक्षण यंत्रणा ही केव्हा बळकट,अभ्यद्य मानली जाते..? जेव्हा त्याची गुप्तचर यंत्रणा अत्यंत प्रभावी असते तेव्हा. जेव्हा ती शत्रूच्या गोटात शिरून  शत्रूची  सर्व माहिती मिळवते, शत्रूच्या राज्यात राहणारी प्रजा आणि त्या प्रजेमध्ये त्या राज्याशी नाराज असलेल्या अशा लोकांना आपल्या बाजूने वळवून, शत्रूला गाफील ठेऊन त्याच्यावर मात करते, आपल्या सैनिकांचे एक थेंबही रक्त न सांडता शत्रू वर विजय मिळवते तेव्हा. अशा हेरगिरीचा इतिहास आणि अशा एक हेर म्हणजेच गुप्तचर संस्थेची गाथा सांगणारे पुस्तक घेऊन मी तुमच्या भेटीला आलो आहे. 

नमस्कार मित्रहो, मला आवर्जून सांगावेसे वाटेल की हे एक असे पुस्तक आहे, जे प्रत्येक भारतीयाने वाचलेच पाहिजे. हे पुस्तक गाथा सांगत आहे त्या सर्व पडद्यामागच्या लोकांची जे कधी प्रत्यक्षात समोर आले नाही पण त्यांचे योगदान आपल्या देशसाठी अतुलनीय आहे आणि कायम राहील. लेखक रवि  आमले यांनी लिहिलेली 'भारतीय गुप्तच संस्थेची गूढगाथा रॉ' हे ते पुस्तक. रॉ म्हणजेच रिसर्च अँड अनालिसिस. या गुप्तचरसंस्थेची तिच्या जन्मापासून ते आजच्या वर्तमानापर्यंतची संपूर्ण कहाणी लेखकाने या पुस्तकाद्वारे मांडली आहे. सुरूवातीच्या प्रस्तावनेमध्ये लेखकाने म्हंटलंच आहे की, तस बघायला गेलं तर ही 'रॉ' ची बखरच आहे. या संस्थेचा इतिहास वाचकांसमोर मांडताना त्या संदर्भांतील ठोस पुरावे, कागदपत्रे यांच्या आधार घेणे हे लेखकासाठी जरुरीचे होते परंतु ते मिळविणे महाकठीण काम होते. जे लेखक रवि आमले यांनी अत्यंत उत्तम प्रकारे केले आहे. कारण वढ्या मोठ्या संस्थेची गाथा जी संस्थाशत्रूच्या गोटात जाऊन गोपनीय माहिती मिळवते, शत्रूला सुगावा लागायच्या आत आपले इच्छित साध्य करते, अशा संस्थेचा इतिहास लेखकाने संशोधक पद्धतीने मांडला आहे. त्यासोबतच ही सर्व माहिती पुस्तकामध्ये मांडताना, ज्या घटना अजूनही रहस्यमय आहेत किंवा ज्यावर उघडपणे बोलता येणार नाही, त्या सर्व घटना अत्यंत सावधगिरीने  मांडण्याची खबरदारी लेखकाने घेतलेली आहे. त्याबद्दल लेखकाचे आवर्जून कौतुक करावेसे वाटते.

रॉ विषयी जाणून घेण्याआधी लेखकाने इतिहासकाळापासून चालत आलेली भारतीय गुप्तचर यंत्रणांवर 'हेरगिरी इतिहासाच्या पानातून' या प्रकरणाद्वारे प्रकाश टाकला आहे. त्यामध्ये महाभारतामधील हेरसंस्था, कौटल्यानीती यापासून ते थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख बहिर्जी जाधव-नाईक यांच्या पर्यंतचा सर्व अभ्यास लेखकाने मांडला आहे. 'रॉ' चा जन्म २१ सप्टेंबर १९६८  साली झाला. आणि त्याच्या जनक इंदिरा गांधी या होत्या. तेव्हा तिचे पहिले प्रमुख होते, रामेश्वरनाथ काव. अत्यंत हुशार आणि दूरदृष्टी असणारे  रामेश्वरनाथ काव यांनी रॉ या संस्थेला इतर देशांच्या गुप्तचर संस्थांच्या धर्तीवर मानाचे स्थान प्राप्त करून दिले आहे. २९३ पानाच्या या पुस्तकामध्ये तब्बल २४ प्रकरणाद्वारे लेखकाने रॉ च्या सर्व कामगिरीची माहिती मांडली आहे. ही सर्व कहाणी वाचल्या नंतर या संस्थेचा अभिमान वाटतो. प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या शत्रूला गाफील ठेऊन, त्याच्याच गोटातील काही व्यक्तींना फोडून आपल्या बाजूने वळवणे यामध्ये रॉ चा खरा हातखंडा आहे. या सोबतच इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान असताना आपल्या भाषणात "आपल्या देशामध्ये घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींमध्ये परकीय शक्तींचा हात आहे"  अशा अर्थाची विधाने करत असत. त्यांच्या या विधानांची विरोधक टिंगल उडवत असत, पण परकीय शक्ती म्हणजे म्हणजे नक्की कोण याचे स्पष्टीकरणसुद्धा लेखकाने समर्पकरित्या दिले आहे. या पुस्तकामधून गुप्तचर यंत्रणांमधील छोट्या-मोठ्या संज्ञा आणि त्यांचे अर्थ सुद्धा लेखकाने दिले आहेत. त्यासोबत पुस्तकाच्या शेवटी लेखकाने संर्भ लेखांची माहिती दिली आहे, यावरून समजून येते की लेखक रवि आमले यांनी हे पुस्तक किती अभ्यासपूर्वक लिहिले आहे.

पुस्तकाचे प्रकाशन मनोविकास प्रकाशन यांनी केले आहे. पुस्तकांचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी अत्यंत समर्पक पद्धतीचे केले आहे. भारतीय गुप्तचरसंस्थेचा पडद्या मागचा इतिहास जाणून घेण्यासाठी प्रत्यकाने वाचावे आणि प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक लेखक रवि आमले लिखित 'रॉ भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा'.




श्रीजीवन तोंदले