Sunday, September 13, 2020

जैविक व रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य इतिहास सांगणारे पुस्तक


 


युद्ध जिवांचे

जैविक व रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य इतिहास.

 

                                 लेखक - गिरीश कुबेर

 

शत्रूच्या सैन्याला प्रत्यक्ष युद्धभूमीमध्ये शस्त्रांच्या मदतीशिवाय ठार मारता येते,ते सुद्धा प्रत्यक्ष युद्धभूमीवर न जात. सर्व गोष्टी सुरळीत पणे सुरु असतात आणि अचानक काही बिघाड होतो (मी बिघाड म्हणतो आहे बदल नाही हा ). दिनक्रम सुरळित सुरू असलेला माणूस अचानक आजारी पडतो. सुरवातीला आपण याआजारपणाकडे वातावरणातील बदल म्हणून दुर्लक्ष करतो. पण हा एखाद्या जैविक अस्त्राचा परिणाम असू शकतो का असा विचार आपण करत नाही. आणि खरंच तसे असेल तर....? जैविक अस्त्रांच्या मदतीने आपल्या सैन्याची जीवितहानी न होता युद्ध जिंकता येते असा इतिहास आहे.

नमस्कार मित्रांनो, आज एक असं पुस्तक घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे जे सांगेल जैविक व रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य इतिहास आणि त्याची भीषणता. लेखक गिरीश कुबेर लिखित युद्ध जीवांचे या पुस्तकाविषयी मी बोलत आहे. या आधी  लेखक गिरीश कुबेर यांचे एका तेलियाने आणि हा तेल नावाचा इतिहास आहे ही पुस्तके वाचली होती. त्यासोबतच दैनिक लोकसत्तामध्ये त्यांनी लिहिलेले अग्रलेख न चुकता वाचत होतो. लेखकाचे प्रत्येक विषयांमधील सखोल ज्ञान हे कौतुक करण्यासारखे आहे. विषयाची मांडणी, लेखन शैली, शब्द मांडणी या सगळ्यांमुळे वाचकाला त्या विषयाचे आकलन होते. शब्दांची मांडणी ही इतकी साधी असते की विषय लगेच समजतो. अशाच उत्तम मांडणीचे उदाहरणं युद्ध जीवांचे हे पुस्तक.

२२२ पानांच्या या पुस्तकामध्ये तब्बल १६ प्रकरणांद्वारे लेखकाने जगामधील जैविक व रासायनिक युद्धाचा इतिहास सखोलपणे मांडला आहे. अगदी इसवीसनपूर्व काळापासून ते आता पर्यंत. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनी, रशिया, अमेरिका, इंगलंड, फ्रान्स यासारख्या देशांनी कशा प्रकारे जैविक आणि रासायनिक शस्त्रांचा वापर केला त्याबद्धल लेखकाने सखोल विश्लेषण केले आहे. रशियाने चीनवर केलेल्या अमानुष अत्याचार, अमेरिकेने केलेल्या नापाम बाँम्ब हल्यात अभागी ठरलेले व्हिएतनाम आणि यासोबत अशा जैविक आणि रासायनिक शास्त्रांच्या बळी पडलेल्या लोकांचे केलेले वर्णन वाचून मन सुन्न होऊन जाते. त्यासोबतच आचार्य रजनीश, शोको असहार यांसारख्या बाबाबुवांची दुष्कर्म या विषयी लेखकाने सखोल विश्लेषण केले आहे.ज्या ज्या देशांनी या जैविक अस्त्रांची भरमसाठ निर्मिती केली,पुढे जाऊन त्याच सगळया देशांनी त्याचा वापर करणार नाही अशी शपसुद्धा घेतली आणि ती सर्व अस्त्रे समुद्राच्या तळाशी बुडवून टाकली.

सरते शेवटी पुस्तकांमधील काही ओळी मला अजूनही अस्वस्थ करतात,त्या म्हणजे "तुमच्या-आमच्या आसपासचा एखादा माणूस असा अनाकनीय आजाराला बळी पडला, तर त्यामागे ही जैविक अस्त्रं किंवा त्यातला एखादा घटकही कारणीभूत असू शकतो. काळजी घ्यायला हवी. हे असे प्रकार घडू लागले आहेत." आजच्या परिस्थितीवर ज्वलंतपणे भाष्य करणाऱ्या या ओळी आहेत ना....?

पुस्तकाचे प्रकाशन 'राजहंस प्रकाशनने'केले आहे. राजहंस प्रकाशनाचे नाव घेताच वाचकाला आपोआपच पुस्तकाच्या उत्तम दर्जाची शाश्वती मिळते. वाचकांना उत्तमोत्तम पुस्तके वाचायला मिळावीत म्हणून ते नेहमीच प्रयत्नशील असतात.पुस्तकाचे मुखपृष्ठ हे पुस्तकाच्या विषयाला साजेसे आहे आणि ते साकारले आहे कमल शेडगे यांनी. प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे पुस्तक लेखक गिरीश कुबेर लिखित युद्ध जिवांचे.



श्रीजीवन तोंदले


Sunday, September 6, 2020

मुंबईमधील गिरण कामगारांच्या आयुष्याची झालेली फरफट,त्यांच्या आयुष्याची विदारक कहाणी सांगणारे पुस्तक

 



रिबोट

                                             लेखक - जी.के.ऐनापुरे

 

 मुंबई. या मायानगरीने किती तरी लोकांना वेडं केलं. ही मायानगरी तिच्याकडे येणाऱ्याला स्वप्न दाखवते, तिच्या चंदेरी लखलखीने भुरळ घालते. या चंदेरी-सोनेरी नगरीच्या मायेला भुलून,आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आलेला कधी कायमचा तिचा होऊन जातो ते त्याचे त्यालासुद्धा समजत नाही. मुंबईमध्ये ज्याने पाय ठेवला त्याने आपली स्वप्ने पूर्ण केली, मान-सन्मान मिळवला तर मुंबई त्याची नाही तर गाव नाही,घर नाही, मुंबई पण नाही. वाट्याला फक्त फरफट..... इकडून तिकडे तिकडून इकडे नुसती फरफट....

नमस्कार मित्रानो लेखक जी.के.ऐनापुरे लिखित 'रिबोट' ही कादंबरी घेऊन आज तुमच्या भेटीला आलो आहे. आत 'रिबोट' ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय याचा विचार तुम्ही करत असाल. काहींनी रिबोट या शब्दाचा अर्थ तांत्रिक भाषेतील re-start असाही  लावला असेल. पण मंडळी ते तसं नाहीये. लेखकाने रिबोट या शब्दाचा अर्थ कादंबरीच्या सुरवातीलाच दिला आहे. तो अर्थ वाचल्यावर आणि कादंबरी पूर्ण वाचून झाल्यावर रिबोट हे नाव या पुस्तकाला समर्पक का आहे हे समजून येते. कादंबरी एकदा वाचायला सुरवात केली की पूर्ण वाचल्याशिवायखाली ठेवता येत नाही. संपूर्ण वाचून झाल्यावर एक अनामीक विचारामध्ये गढून जायला होते.

२१९ पानाच्या या कादंबरीमध्ये गिरणगाव आणि बी.डी.डी चाळीच्या संस्कृती आणि तिथल्या विश्वाचे विदारक दृश्य लेखकाने मांडले आहे. संपाच्या निमित्ताने गिरण्यांचा झालेला अंत आणि त्यामध्ये भरडलेला गरीब कामगार वर्गाची व्यथा लेखकाने अत्यंत योग्य पद्धतीने मांडली आहे. गावाकडून मुंबईमध्ये पैसे कमवायला आणि सुखा-समाधानाचे आयुष्य जगायला आलेला कामगार वर्ग संपामुळे मोठंमोठ्या नेत्यांच्या आणि संघटनांच्या राजकारणाला आणि गिरणीमालकांच्या स्वार्थीपणाला बळी पडतो. यासर्व गोष्टींची मांडणी लेखकाने कथेमधील व्यक्तिरेखांच्या माध्यमातून केली आहे. संपामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालेले काही कामगार मुंबई सोडून आपल्या गावी गेले, पण काही लोकांना मुंबई इतकी मानवली की त्यांना ती सोडविशी वाटेना. मुंबईमध्ये ते असेच भटकत राहिले की त्यांचे गाव नाही.घर नाही.मुंबई पण नाही.मुंबई मधील गणपतीच्या सणाचे वर्णन लेखकाने केले आहे, त्यासोबतच गुन्हेगारीचे वर्णन आणि त्यामुळे कुटुंबांची झालेली वाताहत आणि चाळ संस्कृतीचे वर्णन वाचून मन सुन्न होऊन जाते. वाचणाऱ्याला पुस्तकाचा शेवट अत्यंत क्रूर, किळसवाणा वाटेल पण असा शेवट का व्हावा या विचारामध्ये वाचक नक्की हरवून जाईल. अत्यंत ह्रदयस्पर्शी अशी ही कादंबरी आहे.

पुस्तकाचे प्रकाशन शब्द पब्लिकेशन यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ बाळ ठाकूर यांनी साकारले आहे. प्रत्येक वाचकाने वाचावी आणि प्रत्येकाच्या संग्रही असावी अशी कादंबरी लेखक जी.के.ऐनापुरे लिखित रिबोट.

-         

        

       - श्रीजीवन तोंदले