Sunday, May 31, 2020

मला उद्ध्वस्त व्हायचंय लेखिका- मालिका अमर शेख

 



मला उद्ध्वस्त व्हायचंय

                                   

                            लेखिका- मालिका अमर शेख

 

मालिका अमर शेख यांना आज संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. मी त्यांना ओळखत होतो ते म्हणजे कवी,समाजसेवक,दलित पँथर संघटनेचे निर्माते नामदेव ढसाळ यांची पत्नी म्हणून. पण आज मालिकाजींची खरी ओळख त्यांच्या आत्मचरित्रामधून झाली. कणखर,मनमोकळा स्वभावाच्या मालिकाजींच्या जीवनाचा  प्रवास मला उद्ध्वस्त व्हायचंय  या पुस्तकामधून त्यांनी मांडला आहे.

२३२ पानांच्या या पुस्तकामध्ये सुरवातीलाच प्रस्थावनेमध्ये मालिकाजींनी त्यांचा त्यांच्या आयुष्याकडे बघण्याचा आणि घडून गेलेल्या त्यासर्व घटनांकडे परत बघते वेळी त्यांचा दृष्टिकोन काय आहे,आत्मचरित्र लिहिणे म्हणजे काय याचे संपूर्णपणे विश्लेषण केले आहे. स्व विषयीचे प्रखंड मत त्यांनी या पुस्तकामध्ये मांडले आहे.

वडील मेहबूब पटेलचे अमर शेख झाले. कामगार-चळवळीमधून लाल बावटा युनियन संघटनेत प्रवेश केला. मग पुढे कॉम्युनिटी पार्टीमध्ये प्रवेश आणि तिथे कुसुम जयकर म्हणजे मलिका शेख यांच्या आईशी ओळख आणि त्यांची फँटॅस्टिक प्रेमकहाणी. मग कोणाच्याही विरोधाला न बधता लग्न.त्यावेळचं  इंटरकास्ट लव्हमॅरेज म्हणजे वाचकाला समजले असेल काय हलकल्होळ माजला असेल. दोन कॉम्युनिस्ट कार्यकर्ते, दोन पुरोगामी मने, त्यांचे समाजाविषयीची मत. त्यांचे हे विचार त्यांच्या पाल्यांमध्ये उतरले असणारच. त्याचे दर्शन घडते ते मलिकाजींच्या मोठ्या बहिणीने कोर्टामध्ये 'माणुसकी' हीच आमची जात असे सांगितले. मलिकाजींचे वाचन हे खूप अफाट होते. लहानपणी त्या ताप आणि विविध प्रकारच्या आजारामुळे त्या घरीच असत त्यामुळे त्यांची पुस्तकांशी चांगलीच मैत्री झाली. वाचनाबद्धलचा त्यांचा अनुभव त्यांनी खूप छान प्रकारे मांडला आहे.आयुष्याचा हिशेब न ठेवता बेभानपणे फेकून देणाऱ्या आणि धुंदपणे जगणाऱ्या मलिकाजींची ओळख कवी,समाजसेवक,दलित पँथर संघटनेचे नेते नामदेव ढसाळ यांच्याशी झाली.खूप कमी संसारी महिला आहेत ज्यांनी आपल्या नवऱ्याला संपूर्ण पणे ओळखलेलं असतं. पण मलिकाजींनी नामदेव ढसाळ यांना संपूर्ण पणे ओळखले होते. मलिकाजींनी नामदेव ढसाळ यांच्या व्यक्तिमत्वाबद्धल सखोल विश्लेषण केले आहे. त्यामुळे वाचकाला सहज समजून येते कि त्यांनी आपल्या जोडीदाराला किती आत्मसात केले आहे.नामदेवजींच्या व्यक्तिमत्वाला मलिकाजी आई-वडील,नातेवाईक,समाज यांच्याकडून लाड केलेलं लाडकं कोकरू असेही म्हणतात.लेखिकेने नामदेवजींची ओळख ही इतकी जास्त केली आहे की वाचकाला असा प्रश्न पडतो की हे नामदेव ढसाळ यांचे आत्मचरित्र आहे कि काय...?  मलिकजी एक कवयत्री होत्या. ही दोन कवीमने एकत्र आली. मलिकाजींनी त्यांची आणि नामदेवजी यांची झालेली ओळख,मग त्यांचे प्रेम संबंध,त्यांच्या दोघांचं खुलत जाणारे प्रेम,एकमेकाविषयीची मते,त्यांचे मुंबईमध्ये भटकणे आणि त्यासर्व गोष्टी जे प्रेमी युगलक करतात त्यासर्व गोष्टी मलिकजींनी उत्तम प्रकारे मांडल्या आहेत. या दोघांच्या प्रेम कहाणी मुळे पुस्तकामध्ये रंजकता आली आहे.

आता यासर्व गोष्टी वाचून वाचकांना प्रश्न पडला असेल कि इतकं सर्व चांगलं लिहिलं आहे तर मग पुस्तकाचे शीर्षक मला उद्ध्वस्त व्हायचंय असे का...?

तर या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचले पाहिजेल. कारण एक संघटना चालवणाऱ्या नेत्या सोबत संसार करणे ही साधी गोष्ट नव्हती. प्रसंगी खूप यातना भोगाव्या लागणार होत्या. कधी कधी घरचं सोडून बाहेरचंच बघावं लागणार होतं. त्यामध्ये स्वतःची आणि आपल्या सोबत असणाऱ्या सर्वांची फरफट होणार होती. एका प्रसंगामध्ये मालिकाजीं सांगतात की दलित पँथर संघटनेच्या काही कामसाठी त्यांनी आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून दिल्या आणि त्या पूर्ण कोरड्या झाल्या. पुढे त्यांनी नामदेवजींकडून ठेवलेल्या अपेक्षा कशा भंग झाल्या आणि त्यांचे आयुष्य कसे उध्वस्थ झाले हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचले पाहिजे.

मालिका शेख जरी या पुस्तकाच्या लेखिका असल्या तरी त्या मूळ कवीच आहेत हे त्याच्या लिखाणावरून समजून येते. वाक्यांची बांधणी अशा प्रकारे केली आहे,की ते वाचतेवेळी आपण एखादे काव्य वाचत आहोत असा भास होतो. वाक्यांच्या अशा मांडणीने मलिकाजीं वाचकाला पुस्तकासोबत धरून ठेवतात. त्यामुळे संपूर्ण पुस्तक वाचून झाल्याशिवाय खाली ठेवता येत नाही.

पुस्तकाचे प्रकाशन आर्यन पब्लिकेशन्स यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी साकारले आहे. सुखकर आणि  समाधानी आयुष्याची होरपळ होणार आहे हे माहिती असून सुद्धा अखंड प्रेमासाठी आयुष्य उध्वस्थ करणाऱ्या वाटे कडे मलिकाजीं का गेल्या या गोष्टीचा शोध घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचले पाहिजेल. मलिक अमर शेख लिखित मला उध्वस्थ व्हायचंय.

 


श्रीजीवन तोंदले


Friday, May 8, 2020

समाज्यामध्ये वावरणाऱ्या आणि स्वतःला नेते म्हणून घेणाऱ्या स्वार्थी नेत्यांच्या मेंदूला लागलेलं भिरूड कधी निघणार...?








भिरूड
                                   
                                   लेखक - गणेश आवटे



आपला भारत देश. विविध जाती-धर्म,रूढी-परंपरा,प्रदेश,भाषा या सर्वांनी नटलेलासमृद्ध देश.आपल्या देशामध्ये थोर विचारवंत होऊन गेले,ज्यांनी समाजामध्ये प्रबोधन केले. समाजाला विकासाची,उन्नतीची दिशा दाखवली.स्वातंत्र्यलढ्यापासून ते आत्तापर्यंत खूप विचारवंत झाले ज्यांनी आपल्या समाज बांधवांचे योग्य प्रबोधन करून समाजाला योग्य मार्गावर आणले. पण याच थोर विचारवंतांच्या शिकवणीचा काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी वापर केला आणि समाजमध्ये जातीय तेढ निर्माण केली. विकासाच्या मार्गावर असणाऱ्या समाजाला परत अधोगतीच्या काळदरीत ढकलून दिले. अशी कितीतरीउदाहरणं सद्यस्थितीतही आपल्या आजूबाजूला आहेत.....

नमस्कार मंडळी,आज तुमच्या भेटीला असेच एक पुस्तक घेऊन आलो आहे, ज्याने समाजामधील सत्य परिस्थितीवर भाष्य केले आहे. पुस्तकाचे नाव आहे 'भिरुड'. लेखक गणेश आवटे यांनी ग्रामीण जीवनामध्ये चालणाऱ्या जातीय राजकारणावर अत्यंत योग्य पद्धतीने आणि ज्वलंतभाष्य केले आहे. २५१ पानांच्या या पुस्तकाची कथा आपल्याला शहरी आणि ग्रामीण जीवनामधील फरक आणि त्यामधील राजकारण सांगते.

कथेचा नायक तुकाराम रामराव जगताप मराठवाड्यामधील करंडगावचा राहणारा शेतकरी कुटुंबात जन्मलेला तरुण.शिक्षणासोबतच शेतीकडेही त्याचे लक्ष.आपल्या कॉलेजमधली मित्रांसोबत तो 'शिवार साहित्य मंडळ' चालवतो,ज्यामध्ये विविध जातीचे त्याचे मित्र एकत्रित येऊन कथा,कविता करतात आणि त्यावर चर्चासुद्धा करतात.दलित चळवळीमध्ये भाग घेऊन दलितांच्या हक्कासाठी लढाही देतात.कथेचा नायक तुकाराम याच्या अवतीभोवती या पुस्तकाची कथा घडत असते. यासोबतच कथेमध्ये अनेक व्यक्तिरेखा येत रहातात  आणि त्यासर्वांची मांडणी लेखकांनी उत्तम प्रकारे केली आहे.

मराठवाडा विद्यापीठामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारावा या आणि अशा  इतरकाही मागण्यांसाठी सर्व समाज संघटना एकत्र येतात. पण काही दलित नेते हे इतर मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून पुतळा उभारण्याच्या मागणीकडे जास्त लक्ष देतात.पुतळे म्हणजे जातीविषयीचा स्वाभिमान,अशी धारणा समाजामध्ये निर्माण करतात. पण दुसरीकडे काही नेते हे पुतळा उभारणीच्या विरोधात असतात. आणि त्यांच्या विरोधमागची कारणे वाचल्यावर लक्षात येते की,स्वतःला सामाजिक कार्यकर्ते आणि समाजाचे मोठे नेते म्हणविणाऱ्या या नेत्यांचे स्वार्थाचे राजकारण किती भयानक असते. पुतळ्यासंदर्भात दलित समाजाची सवर्णांच्या विरुद्ध आणि सवर्णांची दलितांविरुद्ध माथी भडकवली जातात. आणि मग पुढे जे काही घडत ते वाचून मन सुन्न होऊन जात. नेत्यांच्याएकमेकांच्या सूडाच्या राजकारणामध्ये सामान्य समाज कसा भरकटला जातो,याचे उत्तम उदाहरण म्हणजे या पुस्तकाची कथा.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दलित बांधवाना समाजामध्ये योग्य स्थान मिळावे,यासाठी खूप मोठा संघर्ष केला. त्यासोबतच त्यांनी दलित समाजाचे प्रबोधन केले. 'शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा'ही बाबासाहेबांची शिकवण. त्याप्रमाणे काही दलितबांधवांनी त्याचे अनुकरण केले,बाबासाहेबांप्रमाणे त्यांनी सुद्धा त्यांच्या समाजाचे प्रबोधन केले. परंतु काही शहरी दलित नेत्यांना ग्रामीण भागातील दलितांच्या समस्या समजल्याचनाहीत किंवा त्याकडे त्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. गावामधील दलित लोकांना गावातील सवर्णांच्या विरुद्धभडकावून स्वतः नामानिराळे झाले. खोट्या अट्रोसिटीच्या केसेस घालणे,दलितांना मिळालेल्या सवलती आणि त्याचा त्यांनी केलेला अयोग्य वापर,श्रीमंत दलित मुलगा शासकीय शिष्यवृत्ती उचलतो आणि दुसरीकडे दरिद्री सवर्णाच्या मुलाला परीक्षेच्या फीसाठी पैसे नसतात याचे विदारक दृश्य लेखकाने सविस्तररित्या मांडले आहे.

वतर्मान पत्र आणि पत्रकार हे नेहमी निः पक्षपाती असावेत, त्यांनी नेहमी समाजाच्या बाजूने असले पाहिजे. पण पत्रकार आणि वर्तमान पत्र चालवणारे स्वतःच्या फायद्यासाठी समाजामध्ये तेढ निर्माण करणारे कार्य करतात तेव्हा काय होते याकडे सुद्धा लेखकाने वाचकांचे लक्ष वेधले आहे. एकाच समाजामधील वेगवेगळ्या घटना, समाजामधील प्रवृत्ती यांची केलेली मांडणी वाचून लेखकाच्या विचारशक्तीचा आणि त्याच्याकडे असणाऱ्या सामाजिक दृष्टीचा प्रत्यय वाचकाला येतो.राजकीय,सामाजिक व्यवस्थांचं जातं आणि पिठाच्या गिरणीचे जातं यांचं केलेलं वर्णन मनला स्पर्श करते. व्येवस्थांचं जातं  माणसाचे आयुष्य चिरडून टाकते आणि निष्पाप लोकांच्या आयुष्यच पीठ करून टाकते.

पुस्तकातील भाषा मराठवाड्यातील आहे. त्यामुळे वाचनामध्ये रंजकता येते. पुस्तकाचे प्रकाशन'पॉप्युलर प्रकाशन' यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि पुस्तकांमधील चित्रे चंद्रमोहन कुलकर्णी यांनी साकारली आहेत. प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक आहे. प्रत्येक वाचकाने वाचावे असे हे पुस्तक,लेखक गणेश आवटे लिखित भिरूड.



-         श्रीजीवन तोंदले