Sunday, May 30, 2021

अतिशय सखोल अभ्यास करुन लिहिले गेलेले आणि म्हणूनच संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे.




लज्जागौरी

                लेखक - रा.चि. ढेरे

 

आपला देश हा विविध संस्कृती आणि परंपरांनी नटलेला देश आहे. त्याला लोकसंस्कृतीचा मोठा वारसा आहे. आपल्या देशाचा धार्मिक पौराणिक इतिहास खूप मोठा आणि परिपूर्ण आहे. इतिहासामध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचे, प्रसंगांचे, व्यक्तींचे संशोधन खूप लोकांनी, संस्थांनी केले आहे. पण पौराणिक गोष्टींचे संशोधन करणारे आणि त्यातही देवीदेवतांच्या इतिहासाचे, त्यांच्या संधर्भात सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींचे, त्यांचे विविध भागात सापडल्या जाणाऱ्या मूर्तींचे, उपासनांचे संशोधन आणि योग्य विश्लेषण करणाऱ्या व्यक्तीमध्ये आवर्जून नाव घ्यावे असे व्यक्तिमत्व म्हणजे मराठी इतिहास संशोधक, लेखक रा.चि. ढेरे.

 देवीदेवतांच्या विषयावर संशोधन हा विषय तसा चाकोरी बाहेरचा. तुम्ही केलेले संशोधन लोकांना पटले नाही तर विनाकारण वाढ ओढवून घेण्याचे प्रसंग घडतात. पण लेखक रा.चि. ढेरे हे याबाबतीत अपवाद ठरतात. त्यांनी तुळजाभवानी, महाक्ष्मी, दत्त, विठोबा, खंडोबा, गणपती या आणि अशा अनेक देवीदेवतांवर संशोधन करून आपले मत मांडले. पुर्ववैदिक मातृसत्ताक समाज आणि तत्कालिन समाजाने लैंगीकता आणि निसर्ग याची घातलेली सांगड या गोष्टींवर भाष्य करणारे 'लज्जागौरी' हे पुस्तक घेऊन आज तुमच्या भेटीला आलो आहे.

या २७२ पानांच्या पुस्तकामध्ये दक्षिण भारतामध्ये उत्खननातून सापडलेल्या आदिशक्तीच्या विविध मूर्तींची माहिती, पुरातन काळातील इतिहास, त्यांची केली जाणारी उपासना आणि त्या उपासनेचा हेतू, आदिशक्तीची विविध रूपे आणि त्याच्या उपासनेत आणि नावांमध्ये असणारे साम्य या आणि अशा  बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. महाराष्ट्रामधील काही भाग आणि त्यासोबत दक्षिण भारत, उत्तरपूर्व भारतामध्ये उत्खन्ना दरम्यान सापडलेल्या आदिशक्तीच्या मुर्ती ज्या नाभी पासुन खालचा भाग असणाऱ्या आणि काही योनी रूप असलेल्या आहेत. विश्वासर्जनाची देवता म्हणून त्यांची सर्व भारत देशामध्ये उपासना केली जाते. त्यासोबत ज्या ज्या ठिकाणी या मुर्ती सापडल्या त्या ठिकाणचा पुरातन इतिहास आणि त्यांच्या नावाचे अर्थ यासर्वांची अभ्यासपूर्व मांडणी लेखकांनी या पुस्तकामध्ये केली आहे.  

जोगुलांबा, एल्लम्मा, रेणुका आणि भूदेवी याचे एकमेकांशी असणारे साम्य, त्याच्या पुरातन इतिहासामध्ये असणारी जमदग्नी, परशुराम आणि रेणुका यांची कथा या साऱ्याचा जोड देऊन आदिशक्तीच्या या विचित्र मूर्तीचे विश्लेशन लेखकांनी उत्तम प्रकारे केले आहे. देवीच्या उपासनेत कवडीचे (कवडीची माळ त्यामधील कवडी ) असणारे स्थान आणि कवडीचा योनीसदृश्य आकार याची माहिती आणि त्याचे विश्लेशन यामुळे वाचनामध्ये रंजकता येते. यासोबत दख्खनचे कुलदैवत श्री क्षेत्र जोतिबा याचा संपुर्ण इतिहास, त्याच्या नावाची फोड म्हणजे जोतिबा हे नाव कसे पडले, त्याचे उपासक आणि उपासना, त्याच्या आसपासच्या सर्व देवी-देवतांची मंदिरे, त्याच्या इतिहास, जोतिबा आणि यमाई यांच्या विवाहाची कथा, जोतिबा आणि खंडोबा यांचे एकमेकांशी असणारे साम्य, यासोबत जोतिबा देवाशी निडीत असणाऱ्या सर्व गोष्टींचे विश्लेशन लेखकाने किती अभ्यासपूर्वक लिहिले आहे हे समजते.

जोतिबा सोबतच मातंगी,एल्लम्मा,रेणुका आणि परशुराम यांचा इतिहास,उपासक आणि उपासना याची सर्व माहिती आपल्याला अभ्यासू दृष्टीने मिळते. आपल्या देशांच्या काही भागांमध्ये वारुळाची सुद्धा पूजा केली जाते. वारुळ हे भूमीचे-भूमीच्या सर्जनेंद्रियाचे प्रतीक मानले जाते आणि वारुळाला गर्भाशयाचे प्रतीक सुद्धा मानले जाते, आजही वारूळ रूपात किंवा कामाख्या मंदिरात योनि स्वरूपात तिची पुजा केली जाते; विशेष म्हणजे जीथे शक्तिपिठ आहे, देवीचे  मंदिर आहे तिथे वारूळ असतेच. विविध रूपांनी नटलेले संपूर्ण विश्व मानवीजीवन स्वतःची कूस उसवून जिने निर्माण केले ती आदिशक्ती, जगन्माता, उत्तान मही पृथ्वी, अदिती, रेणुका यांचा पुरातनकाळा पासूनचा संपूर्ण इतिहास अभ्यास पूर्वक मांडणीने सांगणारे असे हे पुस्तक आहे.

पुस्तकाचे प्रकाशन पद्मगंधाप्रकाशन यांनी केलेले असून पुस्तकाचे मुखपृष्ठ रविमुकुल यांनी केले आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लज्जागौरी मातेचा शिरा पासून खालचा भाग असणाऱ्या मूर्तीचे छायाचित्र आहे. मुखपृष्ठावर असलेली प्रतिमा लज्जगौरीची म्हणजेच प्रकृती / पृथ्वि जी  नवसुर्जनासाठी तयार आहे. तिची  पुजा शेतपेरणी आधी, लग्नाआधी सुफल प्राप्तिसाठी करतात. ही  रोमन संस्कृतीमधील प्रजनन देवता व्हिनस सारखी आहे. अतिशय सखोल अभ्यास करुन लिहिले गेलेले आणि म्हणूनच संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे. प्रत्येक वाचकाने वाचावे आणि  प्रत्येक अभ्यासू व्यक्तीच्या आणि वाचकाच्या संग्रही असावे असे हे  लेखक रा. चि.ढेरे लिखित लज्जागौरी!


 

Sunday, May 9, 2021

शेत-शिवारातल्या गोतावळ्याची गोष्ट

 




गोतावळा

                                   

                                       लेखक - आनंद यादव

 

नमस्कार मंडळी, आज तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे, लेखक आनंद यादव लिखित गोतावळाही कादंबरी. लेखक आनंद यादव यांच्या आत्मचरित्र मालिकेमधील घरभिंतीहे पुस्तक वाचले होते, ज्यामध्ये ते ज्या मालकाची शेती फाळ्याने करत होते ते शेत, शेतमालक विकून टाकतो आणि यादव यांचे शेत निघून जाते. या गोष्टीचा सखोल परिणाम आनंद यादव यांच्या वडिलांवर  होतो, आणि याच विषयी लेखकाने घरभिंतीया पुस्तकामध्ये लिहिलं होतं. यातूनच गोतावळाही कादंबरी निर्माण झाली आणि हीच  आहे गोतावळा या कादंबरीची पार्श्वभूमी .

१४५ पानाच्या या पुस्तकाची संपूर्ण कथा ही कथेचा नायक नारायण (नारबा) सांगत आहे. पुस्तकाचे शीर्षक वाचून कोणालाही वाटेल की गोतावळा म्हणजे एखाद्या कुटुंबाची गोष्ट असेल, हो. पण या कुटुंबात फक्त माणसं नसून त्यामध्ये गायी,म्हशी,शेळ्या,बैल,कुत्रे,कोंबड्या,शेत-शिवार आणि शेतीची अवजारे या सर्वांचा समावेश आहे. आता तुम्ही म्हणाल, हे कसलं कुटुंब ? तर मंडळी, हे कुटुंब त्या प्रत्येक शेतकऱ्याचे असतं  जो शेतीला आपले आयुष्य मानतो. त्याच  शेतकऱ्यांपैकी एक  म्हणजे आपल्या कथेचा नायक नारबा जो काळ्या आईची अत्यंत मायेने सेवा करतो. शेतामध्ये वाढणाऱ्या पिकासोबतच त्याचा त्याच्या सवंगड्यांवर तितकाच जीव असतो. त्याचे हे सवंगडी म्हणजे वर उल्लेख केलेले प्राणी आणि अवजारे.नारबाहा शेतामध्ये काम करणारा शेतगडी आहे. शेतामधील प्रत्येक घडणारी गोष्ट तो सांगत आहे, त्याचा संपूर्ण दिनक्रम वैरणी घालणे,शेण काढणे,मोटा धरणे,उसाला पाणी पाजणे अशी आणि किती तरी शेतीची कामे तो करत आहे. या सोबतच त्याचं त्याच्या मळ्यामधील जनावरांवर खूप जीव आहे. नारबा त्याची आणि त्याच्या मळ्याची गोष्ट सांगत आहे; पण त्याच्या सांगण्यामध्ये एक नाराजीचा सूर दिसून येतो. हा सूर त्याच्या एकटेपणाचा आहे.

राहण्याची,खाण्या-पिण्याची सगळी सोय करतो आणि लग्न लावून देतो या बोलीवर मालकाने नारबाला त्याच्या शेतात कामाला आणलेलं असत. बाकीच्या गोष्टी मालक पूर्ण करतो पण लग्नाची गोष्ट कित्येक वर्ष मालक पूर्ण करत नाही. या कारणामुळे नायकाचा सूर हा तक्रारीचा आणि मालकावरच्या नाराजीचा आहे. मळ्याचा मालक हा एक सधन आणि प्रगतीची कास धरणारा शेतकरी आहे. काळासोबत आपण बदलले पाहिजे आणि कालानुरूप शेती केली पाहिजे यावर त्याचा भर आहे. यासाठी मळ्याचा मालक मळ्यातील सर्व जनावरे हळूहळू विकून टाकतो आणि नवीन ट्रॅक्टर घेतो. मळ्यातील एक एक जनावर जाऊ लागते तसे नारबाचे हळवे रूप वाचकांना दिसून येते. पुस्तकामध्ये असे काही क्षण आहेत जे वाचून मन हळवे होते.

लेखक आनंद यादव यांचा जन्म शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांचे संपूर्ण लहानपण शेतीच्या कामांमध्ये गेले. त्यामुळे  शेतीमधील,मळ्यामधील त्यांना माहिती असलेल्या सर्व गोष्टी त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत. पुस्तकाची भाषा पश्चिम महाराष्ट्रातील रांगडी कोल्हापुरी मराठी आहे. त्यामुळे ही कादंबरी अधिक रंजक झाली आहे.पुस्तकाचे प्रकाशन मेहता पब्लिशिंगयांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केले आहे. प्रत्येकानी वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे, अशी ही कादंबरी लेखक आनंद यादव लिखित गोतावळा



Sunday, May 2, 2021

कलक्षेत्राच्या लाडक्या 'बाईंविषयी'

 



झिम्मा आठवणींचा गोफ

                                       

                                                     लेखिका - विजया मेहता

 

 

आपल्या समाजामध्ये अशा काही असामान्य व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहेत, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर, आपल्या अखंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांच्या क्षेत्रामध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे. त्यांचे हे व्यक्तिमत्व आपल्याला प्रभावि करतं, त्यांच्या जडण-घडणीच्या प्रवासातून आपल्याला आपल्या जगण्याचा मार्ग मिळतो. अशाच काही प्रभावशाली व्यक्तींच्या आत्मचरित्रांचीमालिका आम्ही आमच्या 'पुस्तकएक्सप्रेस' या ब्लॉगवर घेऊन आलेलो आहोत, त्यामालिकेतील पुढील व्यक्ती, ज्यांनी मराठी रंगभूमीची चळवळ वाढवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला, दिग्गज नाटकार, कलावंत ज्यांनी घडवले, आपल्या अभिनयाच्या आणि दिग्दर्शनाच्या जोरावर उत्तमोत्तम  नाट्यकृती रंगभूमीवर उभ्या केल्या अशा विजय मेहता म्हणजेच कलक्षेत्राच्या लाडक्या 'बाईंविषयी' आज मी तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे, 'झिम्मा: आठवणींचा गोफ ' हे विजया मेहता यांचे आत्मचरित्र.

४४० पानाच्या या पुस्तकामध्ये लेखिका विजया मेहता यांनी त्यांच्या आयुष्याच्या सर्व आठवणींचा गोफ वाचकांना समोर मांडला आहे. हा गोफ त्या वाचकाला आपल्यासोबत, आपल्यासमोर बसवून सांगत आहेत असा अनुभव हे पुस्तक वाचते वेळी येतो. पुस्तक वाचताना असं प्रकर्षाने जाणवतं की या पुस्तकाची विभागणी चार भागामध्ये सहज सोपी आहे. एक: बाईंचे बालपण; ज्यामध्ये त्या स्वतः बालपणीच्या विजया जयवंत म्हणजे बेबीला डोळ्यांसमोर ठेवून त्यांचे संपूर्ण बालपण आणि त्यांच्या आईच्या बायजीच्या आठवणी सांगतात. दोन: तरुण वयातील विजया ज्यांनी नाट्यक्षेत्रामध्ये पदार्पण केलं, नाट्यकलेचे त्यांना मिळालेले प्रशिक्षण आणि त्यासोबत रंगभूमीवरील त्यांचा वावरया विषयीचे  सविस्तर वर्णन वाचायला मिळतं. तीन:बाईंच्या खाजगीआयुष्यातील घडामोडी, ज्याध्ये त्या नाट्यक्षेत्रासोबत घर-संसार सांभाळत आहेत, यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या बऱ्या-वाईट आठवणी पुस्तकामध्ये उलडल्या आहेत. चौथा भाग :बाईंच्या आजवरच्या रंगभूमीवरी कामाविषयी आहे, ज्यामध्ये त्यांनी आजवर केलेल्या प्रत्येक नाटकाचे दिग्दर्शन आणि अभिनय याबद्दलचा अनुभव आहे. हे पुस्तकम्हणजे खर तर नाट्य, अभिनय आणि सिनेसृष्टीमध्ये काम करणाऱ्यांसाठी एक उत्कृष्ट user manual आहे. कारण बाईंनी केलेल्या प्रत्येक नाटकाविषयी सखोल माहिती यामध्ये मिळते. त्यामध्ये प्रामुख्याने दिग्दर्शन करतेवेळी संहितेवर केलेले  संस्कार, नाटकांच्या तालमीचे नियोजन, रंगमंच व्यवस्था, ध्वनी आणि प्रकाश योजना, त्यासोबतच भूमिकेचा शोध कसा घ्यावा या विषयी बाईंनी सखोल माहिती दिली आहे. रंगभूमी हेच आपलं कार्यक्षेत्र आहे असं समजून त्यांनी  प्रत्येक नाट्यकृती अजरामर केली त्यामुळे त्यांच नाट्यक्षेत्रामध्ये अव्वल स्थान आहे. भारतीय रंगभूमीसोबत बाईंनी विदेशी रंगभूमीवर सुद्धा उल्लेखनीय कामगिरी केली. या विषयी सुध्दा आपल्याला पुस्तकामध्ये वाचायला मिळते. नाट्यानुभव सोबतच लेखिका विजया मेहता यांनी अभिनय प्रशिक्षणविषयी सखोल मत मांडले आहे, ज्यामध्ये त्या प्रामुख्याने स्टॅनिस्लॅव्हस्कीच्या अभिनय थिअरीबद्दल सांगतात. त्यांच्या अभिनयामध्ये,दिग्दर्शनामध्ये स्टॅनिस्लॅव्हस्की, आणि त्यांच्या गुरूंचा इब्राहिम अल्काझी आणि अदी मरझबान यांचे प्रतिबिंब दिसून येते.

ज्या वाचकांना नाट्यकलेमध्ये,अभिनयकलेमध्ये रुची आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक पर्वणी ठरेल कारण बाईंनी केलेल्या प्रत्येक नाटकाविषयी सखोल विश्लेषण पुस्तकामध्ये आहे. जे एका दिग्दर्शकाला,नटाला मार्गदर्शन म्हणून उपयोगी ठरतं. विजया मेहता यांनी मराठी रंगभूमीला नवी दिशा दिली, सोबतच उत्तम नाटकार, कलावंत घडवले. बाईंच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कामगिरी बद्धल त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले त्यामध्ये प्रामुख्याने पद्मश्री,महाराष्ट्र गौरव,कालिदास सन्मान या आणि इतर पुरस्कार आणि सन्मानांबद्धल  पुस्तकामध्ये माहिती वाचायला मिळते.

पुस्तकाचे प्रकाशन 'राजहंस प्रकाशन' यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ सुभाष अवचट यांनी साकारले आहे. पुस्तकांमधील छायाचित्रांमुळे बाईंचा आजवरचा  प्रवास जवळून अनुभवता येतो. प्रत्येक रंगकर्मीने आवर्जून वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे  पुस्तक अभिनेत्री,दिग्दर्शिका विजया मेहता लिखित 'झिम्मा आठवणींचा गोफ.'