Sunday, July 30, 2023

एका सामान्य शिंपिणीची परिस्थितीच्या विरुद्ध दिलेल्या लढ्याची एक असामान्य गाथा..


 


धग

                                                            लेखक - उद्धव ज. शेळके

 

काही माणसं अशी असतात ज्यांच्या आयुष्यात परिस्थिती विरुद्ध झुंजणं तिच्याशी लढा देणे, हे पिढ्यान-पिढ्या चालत आलेलं असतं. जणू हा लढा त्यांची परंपराच बनली आहे. प्रत्येक दिवस अपार कष्ट आणि प्रत्येक रात्र ही उद्याच्या सुखाच्या सोनेरी किरणांची आशा धरणारी असते. एका विस्थापित (विस्थापित म्हणजे कोणत्या तरी प्रकल्पामध्ये स्वतःची जमीन अथवा घर जाऊन झालेले बेघर असं नसून हे उदरनिर्वाहसाठी झालेले विस्थापित) कुटुंबाच्या संघर्षाची कथा सांगणारी कादंबरी, लेखक उद्धव ज. शेळके लिखित " धग "

२१४ पानांची ही कादंबरी वरवर बघायला गेला तर अत्यंत साधी सोप्पी वाटते. कादंबरीची भाषा ही नेहमीची प्रमाण मराठी असली तरी त्याच्यातील बोल हे वऱ्हाडी आहेत. ही वाचायला अवघड नाही. प्रत्येक शब्दांचा अर्थ लगेच समजून येतो. त्यामुळे ह्या कादंबरीचा आशय-विषय वाचकाला आपलंस करून घेतो. कादंबरीची नायिका कौतिक, तिचा पती महादेव आणि त्यांची दोन मुलं भीमा-नाम आणि मुलगी यसोदा. वरवर बघायला गेलं तर एक सामान्य शिंपी कुटुंब. पण ही कथा एका सामान्य शिंपिणीची परिस्थितीच्या विरुद्ध दिलेल्या लढ्याची एक असामान्य गाथा आहे. कौतिक आपल्या पतीने लवकरात लवकर आपला पारंपारिक शिंपी व्यवसाय परत सुरु करावा किंवा निदान छोटेखानी कपड्याचे दुकान तरी सुरु करावे म्हणून स्वतःचे पोठ मारून साठवलेले पैसे देते. त्यासोबतच नवऱ्याने उभा केलेल्या व्यवसायाची ती पहिली गिराइक सुद्धा बनते. जेणे करून आपल्या नवऱ्याने कच न खाता उमेदीने व्यवसाय करावा, पण भरतीच्या गाड्याच्या एका वांढळ बैलाने मान टाकताच जसा गाड्याचा भार दुसऱ्या बैलावर पडतो, तसा नवऱ्याच्या कामचुकार वृत्तीमुळे संसाराचा भार एकट्या कौतिकवर येऊन पडतो. यासोबतच मोठा मुलगा भीमा चुकीच्या संगतीला लागून घरातून परागंध होतो. कौतिक आपला दुसरा मुलगा नामा आणि लहान मुलगी यसोदा यांना घेऊन संसाराचा गाडा वाढत रहाते. तिच्या या लढ्याची धग इतकी आहे कि यामध्ये वाचकाचे मन सुद्धा शेवटी शेवटी होरपळून निघते. पुढे जाऊन कौतिकवर असहाय्य परिस्थिती ओढवते ज्यामध्ये मुलगा नामा भरडला जातो. नामाला शिक्षणाची खूप आवड आहे. खूप शिकावं अशी त्याची इच्छा असते, पण सरते शेवटी परिस्थितीच्या विरुद्धचा हा लढ्या एकट्या कौतिकचा न राहता तो नामाचा होऊन जातो. एक अनामकी आशेच्या किरणाची, एका अनामिक मदतीच्या हाताची तो वाट बघत, शिक्षण सोडून एका हॉटेलमध्ये भांडी घासण्याची नोकरी स्वीकारतो. नामाची झालेली ही अवस्था बघून खरंच वाचकाचे मन हळहळते.......

कादंबरीचे प्रकाशन केले आहे पॉप्युलर प्रकाशन यांनी. पुस्तकाचे मुखपृष्ठ भ.मा. परसवाळे यांनी साकारले आहे. साधी शैली असणारी ही कादंबरी नेहमीच्या विषयांसारखी न वाटता वेगळी वाटते. वास्तवाचे दर्शन घडवणारी ही कादंबरी प्रत्येक वाचकाने जरून वाचली पाहिजे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही जरूर असावी.

Sunday, June 25, 2023

इस्रायलच्या चौथ्या पंतप्रधान,आयर्न लेडी गोल्डा मेयर

 




गोल्डा एक अशांत वादळ

 

                                  लेखिका - वीणा गवाणकर.

 

 

   हे पुस्तक अशा लोकांसाठी खास आहे ज्यांना जागतिक राजकारणामध्ये रुची आहे, ते समजून घेण्याची इच्छा आहे, अशा लोकांसाठी हे पुस्तक एक पर्वणीच ठरेल. हा प्रवास आहे एका सामान्य स्त्रीचा. एक सामान्य स्त्री ते धडाडीची कार्यकर्ती आणि मग प्रत्येक अडचणींवर मात करत, राजकारणामध्ये दरमजल दर करत एक कणखर पंतप्रधान पर्यंतचा हा प्रवास आहे. मी बोलत आहे लेखिका वीणा गवाणकर लिखित, इस्रायलच्या चौथ्या पंतप्रधान गोल्ड मेयर यांचं चरित्र  "गोल्ड एक अशांत वादळ....!"

३१३ पानांचे हे पुस्तक समजून घेण्यासाठी आपल्याला या पुस्तकाची चार भागांमध्ये विभागणी केले पाहिजे.ती पुढील प्रमाणे...

एक गोल्ड मेयर यांनी ज्या लोकांसाठी संपूर्ण आयुष्य संघर्ष केला, त्या लोकांना स्वतःची जमीन, आपला देश मिळवा जिथे त्यांचे मूळ पुरुष होते. ते लोक म्हणजे ज्यू. ह्या ज्यू लोकांचा द्वेष का केला जात होता हे समजून घेतलं पाहिजे. हा थोडा मोठा इतिहास आहे ज्यासाठी आपल्या इ.स पूर्व काळामध्ये गेलं पाहिजे. वैभव संपन्न असणाऱ्या ज्यू सत्तेला सालोमन राजा नंतर उतरती कळा लागली. रोमनांच्या अत्याचारामुळे ज्युना पलायन करावं लागलं. जे ज्यू युरोपमध्ये गेले त्यातल्या एका कुटुंबामध्ये येशू ख्रिस्तजन्माला आले. येशू हे मूलतः ज्यू होते पण त्यांनी रोमन एम्पायरमध्ये आपली वेगळी शिकवण द्यायला सुरुवात केली. जसं गौतम बुद्ध यांनी बौद्ध धर्माची शिकवण दिली., आणि बौद्ध धर्माचा तिथून प्रसार झाला, तसंच येशू ख्रिस्त यांनी ख्रिश्चन धर्माची शिकवण द्यायला सुरवात केली आणि तेथून ख्रिश्चन या धर्माचा प्रसार सुरू झाला. येशू ख्रिस्ताच्या या शिकवणीचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आणि ते लोकप्रिय होऊ लागले. या कारणाने ज्यू राज्यकर्त्या लोकांनी येशू ख्रिस्तांना मोठ्या जनसमुदायासमोर क्रॉसला लटकावून मारलं. येशूच्या मारेकरी यागोष्टीमुळे ज्यू लोकांविरुद्ध द्वेषाच्या वातावरणाला सुरुवात झाली. हे वातावरण इतके भयानक होते की ज्यू लोकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जगभरामध्ये पलायन केले.

दुसरा भाग म्हणजे, पुढे जे ज्यू लोक संपूर्ण जगभरामध्ये मुख्यतः युरोपमध्ये पसरले होते त्या लोकांना आपल्या मूळ देशाशी, मूळ जमिनीशी ओढ होती. ती तेव्हा अरब देशांच्या ताब्यात होती. तेव्हा प्रत्येक ज्यू लोकांना आपल्या त्या देशामध्ये परत जायचं होतं आणि इथून सुरवात होते ज्यू लोकांच्या अस्तित्वाच्या लढाईला ज्याला 'झायॉनिसीम' म्हणून ओळखलं जातं. या चळवळीचा एकच हेतू होता तो म्हणजे ज्यू लोकांना आपला देश परत मिळावा. या चळवळीमध्ये पुढे गोल्डा सहभागी झाली.

तिसरा भाग येतो, गोल्डा यांचा जन्म ३ मे १८९८ मध्ये युक्रेन (रशिया) मधील केएव येथे झाला. रशियन लोकांकडून ज्यू लोकांवर होणारे हल्ले गोल्डने तिच्या बालपणीच पाहिले होते. ते दृश्य तिच्या बालमनावर कायमच कोरलं गेलं होतं. पुढे १९०६ मध्ये गोल्डाचा परिवार अमेरिकेत मिलवॉकीमध्ये आले. तिथे गोल्डाचे वडील रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये काम करत तर आईने एक छोटं किराणा दुकान सुरु केलं. गोल्डची मोठी बहीण शेयना ही झायॉनवादी श्रमिक चळवळीमध्ये गुंतली होती आणि त्याचा प्रभाव छोट्या गोल्डावर पडला. समाजवाद, झायॉनवाद्यांचे तत्वज्ञान तिला आवडे. ज्यूंना स्वतःची राष्ट्रभूमी हवी हे विचार तिच्या मनामध्ये रुजू लागले. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता गोल्डने तिचे शिक्षण पूर्ण केले आणि झायॉनवादी श्रमिक चळवळीमध्ये सक्रिय होऊ लागली. त्यासाठी निधी संकलन करणे, चर्चा सत्रांमध्ये भाग घेणे. आपल्या नव्या राष्ट्राच्या कल्पना लोकांपर्यंत पोचवणे यासारखे काम ती करत असे. तिच्यामधील उत्साह, चैतन्य, अस्खलित इंग्रजी, या गोष्टींच्या जोरावर तिचा जनसंपर्क खूप मोठा होता आणि हीच गोष्ट पुढे राष्ट्र उभारणीसाठी उपयोगी पडली. यासोबतच ज्यू निर्वासितांच्या प्रश्नांवर त्यांच्या स्थलांतरणासाठी ती नेहमी प्रयत्नशील असे.

चौथा भाग म्हणजे १४ मे १९४८ मध्ये ज्यूंचे स्वतंत्र राष्ट्र उभारले ते म्हणजे 'इस्रायल'. या राष्ट्र उभारणीमध्ये ज्या मोठं मोठ्या नेत्यांचा सहभाग होता त्यांच्या बरोबरीने गोल्डाचे योगदान तितकेच महत्वाचे होते. पुढे मंत्रिमंडळामध्ये श्रम आणि रोजगार मंत्री, परराष्ट्रमंत्री ते पंतप्रधान. अत्यंत कठीण काळामध्ये इस्रायलचे नेतृत्व, गोल्डाचा हा प्रवास वाचकांना प्रभावीत करतो. वयाची सत्तरी उलटलेली गोल्डा इस्रायलची पंतप्रधान झाली. सिरिमाओ बंदरनायके (श्रीलंका) इंदिरा गांधी (भारत) यांच्या नंतर तिसरी स्त्री पंतप्रधान गोल्डा मेयर. गोल्डा यांना इस्रायलच्या धाडसाचं-शक्तीचं-भक्तीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. राष्ट्र प्रेमाची प्रेरणा प्रत्येक ज्यु लोकांच्या मनामध्ये निर्माण करणाऱ्या गोल्डा मेयर यांनी इस्रायल या ज्यु राष्ट्राला सक्षम बनवण्यात आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले.

या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांनी गोल्ड मेयर यांचा हा भारावून टाकणारा प्रवास या पुस्तकाच्या माध्यमातून मांडला आहे. लेखिका वीणा गवाणकर यांनी गोल्डा मेयर यांचे चरित्र अशा पद्धतीने मांडले आहे की हे फक्त चरित्र न राहता ते एका गोष्टी स्वरूपामध्ये उतरलं आहे, आणि इस्रायली पंतप्रधान होत्या तशा वाचनाच्या माध्यमातून समोर येतात. या पुस्तकाचे प्रकाशन इंडस सोर्स  बुक्स यांनी केले आहेत. पुस्तकाचे मुखपृष्ठ मनोज आचार्य यांनी केले आहे. जागतिक राजकारणामध्ये रुची असणाऱ्या प्रत्येकसाठी आणि प्रत्येक वाचकाने जरूर वाचावे आणि प्रत्येकाच्या संग्रही असावी असे हे पुस्तक, लेखिका वीणा गवाणकर लिखित गोल्ड एक अशांत वादळ.....!


Sunday, March 26, 2023

समाजाने वेशीबाहेर ढकललेल्या एका अन्यायग्रस्त जमातीच्या उत्कर्षासाठी झटणाऱ्या एका कार्यकर्त्याने मांडलेली ही कैफियत आहे......

 




पारधी

                                                         लेखक - गिरीश प्रभुणे

 

 आज आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे ७५ वर्ष साजरे करत असलो तरीही, आपला देश जाती धर्माच्या अतूट विळख्यामध्ये अडकला आहे. जेथे समाजासमोर बेरोजगारी, महागाई सारख्या मोठ्या समस्या असताना सुद्धा जाती धर्माला जास्त महत्व दिलं जात आहे. अशा विदारक परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या आजू बाजूला असे काही लोक आहेत जे मानवतेवर, मनुष्य धर्मावर विश्वास ठेवणारे आहेत. जाती-धर्माला न महत्व देता ते समाजासाठी काम करत आहेत. समाजामधील तळागाळातील लोकांसाठी, त्यांच्या हक्कासाठी, त्यांना मूलभूत सेवा-सुविधा मिळाव्या यासाठी कोणत्याही पद्धतीचा स्वार्थ हेतून न बाळगता ते स्वतःचे आयुष्य खर्ची करत आहेत. कोणत्याही फळाच्या अपेक्षे शिवाय. अशा लोकांपैकी एक नाव आवर्जून घेतले पाहिजे ते म्हणजे आदरणीय पद्मश्री गिरीश प्रभुणे (प्रभुणे काका).

नमस्कार मंडळ, मी आज एक असं पुस्तक घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे, जे फक्त एक आत्मचरित्र नसून ते त्या व्यक्तीचा, त्यांनी केलेल्या कार्याचा प्रवास सांगणारे आहे. मी बोलत आहे, लेखक गिरीश प्रभुणे लिखित पारधी या पुस्तकाविषयी. ३८८ पानांच्या या पुस्तकाच्या माध्यमातून लेखक गिरीश प्रभुणे यांनी पारधी समाजासाठी केलेल्या अमूल्य कामाचा, पारधी समाजाच्या हक्कांसाठी, त्यांच्या होणाऱ्या अन्यायाविरुद्ध केलेल्या संघर्षाचा प्रवास ते वाचकां समोर मांडत आहेत. चळवळीच्या माध्यमातून काम करतेवेळी लेखकाने पारधी समाज जवळून पाहिला, समजून घेतला तो या पुस्तकामध्ये शब्दांच्या माध्यमातून मांडला असं म्हंटलं तरी चुकीचं ठरणार नाही. 

पारधी या समाजाने शिवरायांच्या स्वराज्य उभारणीमध्ये आपले योगदान दिले होते. पारधी हा समाज(जात) निष्ठावान म्हणून ओळखली जात होती. या समाजाने आपल्या देशाच्या स्वातंत्र लढ्यामध्ये भाग घेतला, शिवरायांच्या गनिमी कावा या तंत्राने त्यांनी इंग्रजांशी झुंज दिली. या लोकांना पकडणे इंग्रजांसाठी अशक्य होते. म्हणून इंग्रज सरकारने या समाजाला चोर-दरोडेखोर म्हणून घोषित केले. तेव्हा पासून ते देशाला स्वातंत्र मिळून ५०-६० वर्षे होऊन सुद्धा हा समाज मूळ प्रवाहामध्ये सामील होऊ शकला नाही. समाजातील मुख्य घटकातील लोकांकडून, पोलीसांकडून या समाजावर वेळोवेळी अन्याय होत गेले. त्यापैकी काही घटनांचे वर्णन या पुस्तकांमध्ये आहे. ते वाचते वेळी मन सुन्न होऊन जाते. सदैव परागंदा असणाऱ्या या समाजाला स्वतःचे घर नव्हते कि स्वतःच असं गाव नव्हते. उदरनिर्वाहाचं साधन म्हणून या लोकांनी चोरी हा मार्ग पत्करला. शिकारीच्या वाटणीसाठी, बायको-मुलांसाठी भांडणारी ही लोकं एकमेकांचा खून पाडत, क्रूरपणे हत्या करून दरोडा घालणाऱ्या यालोकांना मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी, त्यांना स्वतंत्र-समता-बंधुता या गोष्टी समजावून देण्यासाठी, त्यांना सुखकर आयुष्य देण्यासाठी लेखक गिरीश प्रभुणे यांनी समरस्ताच्या माध्यमातून ही चळवळ उभी केली. यमगरवाडी, मगर सांगावी या प्रकल्पाच्या माध्यमातून या समाजाला रोजगार, राहायला स्वतःच घर आणि त्याच्या मुलांसाठी योग्य शिक्षण यासर्व सुविधा मिळवून दिला. हे सगळं त्यांनी निस्वार्थीपणाने केलं. हे सर्व करताना प्रभुणे यांना खूप अडचणी आल्या कधी शासन व्यवस्थेकडून तर कधी खुद्ध पारधी लोकांकडून. न डगमता, न खचता ते सदैव लढत राहिले. वडार, कैकाडी, डवरी गोसावी, गोंधळी, डोंबारी, कोल्हाटी, लंबाडी आणि पोथुराजू या समाजासाठी सुद्धा त्यांनी काम केलं. त्यांच्या या कार्यामध्ये त्यांना खूप लोकांची मदत मिळाली. यासोबतच या चळवळीच्या माध्यमातून काही नवीन कार्यकर्ते त्यांनी तयार केले, जे पुढे जाऊन त्यांच्या सोबत काम करू लागले.

प्रभुणे सरांचा हा प्रवास प्रत्येकाला भारावून टाकणारा आहे. जाती भेदाच्या भिंती मोडून, समाजातील एका वर्गाला मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठीचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे यात शंका नाही. या पुस्तकाचे प्रकाशन राजहंस प्रकाशन यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि पुस्तकातील रेखाटने ज्यामुळे प्रत्येक प्रसंगाचे गांभीर्य समजून येते. ते केले आहे बाळ ठाकूर यांनी. प्रत्येक व्यक्तीने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक लेखक, पद्मश्री गिरीश प्रभुणे लिखित पारधी.

Sunday, January 29, 2023

स्तानिस्लावस्कीची रंगमंचकला ही अजरामर मार्गदर्शनदीपिका.....

 


रंगमंचकला

                                               

                                                     लेखक - स्तानिस्लावस्की

 

                                 मराठी अनुवाद - ओंकार गोवर्धन.

 

कोंस्टेंटिन स्तानिस्लावस्की यांचे मूळ नाव Alexeyev. अतिशय श्रीमंत घरातील त्यांचा जन्म. त्यांचे वडील मोठे उद्योगपती होते. Alexeyev चे बालपण अतिशय सुखात गेले. सुरुवाती पासूनच त्यांना कलेची जास्त ओढ होती. हे पाहता १८७७ आणि १८८१ मध्ये त्यांचा वडलांनी त्यांना थिएटर बांधून दिले. नट आणि दिग्दर्शक म्हणून स्तानिस्लावस्की यांची सुरुवात याच रंगमंचावर झाली. पुढे व्यावसायिक नट बनून काम करणे हे त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक दर्जाला तडा देणारे होतं, म्हणून आपल्या घरच्यांपासून लपवून त्यांनी स्वतःचे कोंस्टेंटिन स्तानिस्लावस्की हे नाव लावले, १८८४ साली कोंस्टेंटिन स्तानिस्लावस्की हे त्यांचे रंगमंचीय नाव झाले. जगभरातल्या प्रत्येक रंगकर्मींसाठी स्तानिस्लावस्की हे एक आदरणीय नाव. अभिनयाविषयीचे मूलभूत कार्यपद्धतीचे चिंतन त्यांनी केले. त्या पद्धती त्यांनी अभिनयव्यहारात लागू केल्या. स्तानिस्लावस्की यांच्यावर पात्र जगणं या गोष्टीचा मोठा प्रभाव होता. पात्र जगणं या क्षमतेला आजमावण्यासाठी ते कधी कधी वेगवेळ्या पात्रांचा वेश करून वावरत असत. रंगमंचीय क्षेत्रात स्तानिस्लावस्की यांनी अनेक सिद्धांत मांडले. त्यासोबत काही नीतिनियमांचा स्तानिस्लाव्हाकी  यांनी नाट्य व्यवहारात कायमच पाठपुरावा केला. स्तानिस्लावस्की म्हणतात अभिनय ही केवळ रंगमंचावर सादर करण्याची कला नसून स्वेच्छेने निवडलेले जीवितकार्य होय. रंगमंचावरील सहजसुलभ वावर, प्रभावी शब्दफेक, अर्थपूर्ण विराम यांविषयी केलेले मार्गदर्शन म्हणजे रंगमंचकला.

नमस्कार मंडळी, मी आज तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे, स्तानिस्लावस्की यांनी शब्दध केलले रंगमंचकला  (The Art Of The Stage) हे पुस्तक. या पुस्तकाचा सुंदर मराठी अनुवाद केला आहे अभिनेते ओंकार गोवर्धन यांनी. हे पुस्तक नाट्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असे आहे. १९५ पानांच्या या पुस्तकाच्या माध्यमातून स्तानिस्लावस्की आपल्याला नाट्यव्यवहारातील नीतिनियमांविषयी सांगतात.सुमारे ३१ प्रकरणांच्या माध्यमातून प्रत्येक कलाकाराने नाट्य क्षेत्रामध्ये आपली वर्तवणूक कशी ठेवली पाहिजे हे साध्या आणि सोप्या शब्दात सांगतात. स्टुडिओ १,,३ या प्रकरणांमधून (स्टुडिओ म्हणजे नट जेथे नाटकाची रोज तालीम करतो, नटांना जिथे प्रशिक्षित केले जाते ती जागा) स्टुडिओ मध्ये कशा प्रकारचे वातावरण असावे आणि नको असलेल्या पद्धतीचा व्यवहार नटाने आणि शिक्षकाने कसा टाळावा यावर सुद्धा ते भाष्य करतात.नटाने रंगमंचावर वावरतेवेळी एकाग्रता, हावभाव, संवाद यावर कसे काम करावे या आणि अशा कितीतरी पद्धती ज्या नटांसाठी उपयुक्त आहेत त्यासर्वांची माहिती आपल्याला या पुस्तकामध्ये मिळते.

स्वतः नाट्यक्षेत्रामध्ये काम करते वेळी मला या पुस्तकाचा आणि यामधील प्रत्येक गोष्टींचा खूप फायदा झाला. स्तानिस्लावस्की यांनी नटाचा  व्यवहार त्याचे आचरण, नाट्यगृह बाहेर त्याने कसे वागले पाहिजे यासंदर्भात सुद्धा ते काही घटनांचे संधर्भ देऊन सांगतात. प्रयोगाच्या आधी नटाने स्वतःची तयारी कशी करावे हे सांगते वेळी त्यांनी काही प्रसिद्ध नटांचे उदाहरण सुद्धा दिले आहे, ज्याचा उपयोग प्रत्येक कलाकाराला होईल यात शंका नाही. स्तानिस्लावस्कीची ही अजरामर मार्गदर्शनदीपिका अभिनेते ओंकार गोवर्धन यांनी मराठीमध्ये आणली त्याबद्दल त्यांचे खूप खूप कौतुक आणि आभार.पुस्तकाच्या मनोगतामध्ये  ते सांगतात की त्यांच्या कारकिर्दीच्या टप्प्यावर त्यांची स्तानिस्लावस्किनशी ओळख झाली. माझ्या बाबतीत सुद्धा मी हेच म्हणेन कारण कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मला हे पुस्तक मिळाले ज्यामुळे मला माझा प्रवास सुखद वाटतो.

आता सरतेशेवटी या पुस्तका संदर्भात एक प्रश्न उरतो की या पुस्तकाचा वाचक वर्ग कोणता ? तर या प्रश्नाचे उत्तर अभिनेता ओंकार गोवर्धन यांनी त्यांच्या मनोगतामधून दिले आहे. पुस्तकाचे प्रकाशन राजहंस प्रकाशन यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ सुनीत वडके यांनी केले आहे. प्रत्येक नाट्य कलाकाराने वाचावे, प्रत्येक कलाकाराच्या संग्रही असावे आणि प्रत्येक वाचकाने जरूर वाचावे असे हे पुस्तक रंगमंचकला.

Monday, September 5, 2022

गोष्ट एका नदी जगलेल्या नदीष्टची...............

 



नदीष्ट

 

                          लेखक - मनोज बोरगावकर.

 

 

माणसाचे आयुष्य हे चाकोरीबद्ध असते. नेहमीच्या अंगवळणी पडलेल्या गोष्टीच माणसाचे  आयुष्य चालवत असतात. चाकोरीबद्ध झालेल्या जगण्यात एक प्रकारेच साचलेपण आलेले असते. याच साचलेपणाला दूर करण्यासाठी, या चाकोरीतुन बाहेर पडण्यासाठी आपण काही तरी वेगेळे करू पाहतो. आपल्या नेहमीच्या रुटिंग मधून थोडा वेगळं काढून आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करतो. उदा. गाणं गाणे, फिरायला जाणे, पोहणे, सायकलिंग करणे, नाटक-सिनेमा बघायला जाणे, ट्रॅकिंगला जाणे, पुस्तक वाचणे या आणि अशा किती तरी गोष्टी ज्याच्या माध्यमातून आपण मुक्त होत असतो. कोण याला छंद म्हणत असतो तर कोणी याला गरज म्हणत असतो. याच गोष्टी सतत करणाऱ्याला नादिष्ट सुद्धा म्हणतात. मी आज असेच एक पुस्तक घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे. ज्याचा विषय असाच आहे. मी बोलत आहे नादिष्ट नाही तर नदीष्ट  मनोज बोरगावकर लिखित नदीष्ट या पुस्तकाबद्द्दल.

१६६ पानांच्या या पुस्तकाच्या सुरवातीलाच लेखक मनोज बोरगावकर हे नदीष्ट का आहेत, त्यांना हा पोहण्याचा नाद का आणि कसा लागला हे एका सुंदर उदाहरणाने ते सांगतात. म्हणजे नदी आणि आईचा गर्भ. आईच्या गर्भाच्याशी नदीच्या डोहाचे केले वर्णन मनाला स्पर्श करते. या एका संदर्भाने लेखक नदीसोबत किती जोडलेला आहे हे समजून येते. लेखक रोजच्या चाकोरीबद्ध जीवनातील साचलेपण दूर करण्यासाठी नदीवर नियमितपणे पोहायला जात असतो. नदीमध्ये पोहणे त्याला समृद्ध करत असते. लेखकाचे विशेष कौतुक करावेसे वाटते, कारण नदीचे आणि नदीच्या किनाऱ्यावरील परिसराचे केलेले वर्णन मनाला स्पर्श करून करते. सतत वाहत असणाऱ्या नदीच्या किनाऱ्यानेच उदात्तपण आणि संस्कृती वसत गेली. पण आपण नदीपासून दुरावत गेलो आणि आपले उदात्तपणही हरवले गेले हे लेखकाचे मत आजच्या युगाला तंतोतंत जुळणारे आहे. लेखक गोदामाईच्या उदरातील आणि परिसरातील प्रत्येक गोष्ट नव्याने अनुभवतो आणि त्याच गोष्टी त्याला समृद्ध करत गेल्या. याच गोदामाईच्या किनाऱ्यावर लेखका काही व्यक्तीसुद्धा भेटल्या. नकळतपणे त्यासर्व व्यक्ती लेखकाच्या जीवनाचा एक भाग झाल्या. त्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याची एक करुण कथा ऐकत आणि त्यांचे आयुष्य समजावून घेत लेखक त्यांच्या सोबत नदी प्रमाणे वाहत राहिला.

तृतीयपंथी असणाऱ्या सगुणाच्या नशिबी आलेले भोग, तर नकळत केलेल्या चुकीच्या कृत्यामुळे प्रायश्चित म्हणून स्वीकारलेलं आयुष्य जगणारा भिकाजी यांच्या करुण कथा वाचून मन हळहळते. यासोबतच नदीत मासे पकडणारा बामणवाड, लहान वयापासूनच साप पकडणारा सर्पमित्र प्रसाद, लेखकाला ज्यांनी नदी कशी पार करावी आणि नदीच्या खोल डोहात कसे अलगत शिरावे याचे धडे देणारे दादाराव, नदी किनाऱ्यावरच्या सर्व गोष्टींची इतंभूत माहित ठेवणार कल्लुभाईया, मंदिरातील पुजारी जो लेखकाच्या मर्जीने नाही तर त्याच्या इच्छेवर नायकाला चहा देणारा, हे सर्व लोक नदीच्या निमित्याने लेखकाशी जोडले जातात. यासर्वांची गोष्ट लेखकाने वाचकांच्या समोर ठेवली आहे जी वाचकांना मोहित करते.

प्रत्येक व्यक्तीने आपल्या नेहमीच्या रुटिंग मधून थोडा वेळ काढून स्वतःला समृद्ध करेल अशा काही गोष्टी केल्या पाहिजे. साचलेपणाने आयुष्य जगणे सोडून मुक्तपणे आयुष्याकडे पाहिले पाहिजे. मुक्तपणे आयुष्य जगले पाहिजे. आयुष्याकडे नव्या नजरेने बघत येईल. या पुस्तकाचे प्रकाशन ग्रंथाली प्रकाशन यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ नयन बाराहाते यांनी साकारले आहे. प्रत्येक वाचकाने जरूर वाचावे आणि प्रत्येकाची संग्रही असावे असे हे पुस्तक  मनोज बोरगावकर लिखित नदीष्ट!

एका सामान्य शिंपिणीची परिस्थितीच्या विरुद्ध दिलेल्या लढ्याची एक असामान्य गाथा..

  धग                                                              लेखक - उद्धव ज. शेळके   काही माणसं अशी असतात ज्यांच्या आयुष्यात परिस...