Wednesday, February 19, 2020

बुद्धीच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी केली बलाढ्य अफझलखानावर मात.






लक्षवेध
                            लेखक -रणजित देसाई

आज पर्यंत शिवचरित्र खुप वेळा वाचले. नुसतं वाचलं नाही तर त्याचे जणु पारायण केले. शिवचरित्र म्हणजे अखंड आदिम महासागर. ओंजळ भर काढले काय आणि हंडा भर काढले काय तरीही कमीच वाटणारे. त्यामधील प्रत्येक घटना,प्रत्येक प्रसंग म्हणजे एक स्वतंत्र पुस्तकच. संपुर्ण शिवचरित्र हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणा देणारे स्रोत. शिवरायांचा जन्म, आपल्या सवंगड्यां सोबत रोहिडेश्वराला साक्ष ठेऊन हिंदवी स्वराज्याची घेतलेली शपत, सोळाव्या वर्षी घेतलेला तोरणा गड, अफझलखाणाच्या रूपाने स्वराज्यावर आलेलं सर्वात मोठं संकट, पावनखिंडीतील शौर्य गाथा, महाराजांची आग्रयाहून सुटका,  स्वराज्यामध्ये परत मिळवलेला कोंडाणा किल्ला(सिह गड) या आणि अशा किती तरी घटनांनी शिवचरित्र हे एक अखंड,आदिम महासारग बनलं आहे. म्हणुन वर म्हंटल्या प्रमाणे ओंजळ भर काढलं काय आणि हंडा भर काढलं काय तरीही ते कमीच वाटावं.

आपल्या महाराष्ट्रामध्ये  आणि मराठी साहित्यविश्वामध्ये खुप इतिहासकार होऊन गेले आणि होत आहेत. प्रत्येक जण आपल्यापरीने शिवचरित्र लोकांसमोर मांडत आहेत. त्याचा प्रसार करत आहेत. आज पर्यंत खुप इतिहासकारांनी शिवरायांचा इतिहास कादंबरीच्या माध्यमातुन मांडला त्यामध्ये प्रामुख्याने नाव घ्याचे तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे. सोबतच एक नाव आवर्जुन घावे ते म्हणजे स्वामीकर रणजित देसाई यांचे.लेखक रणजित देसाई यांच्या लेखणीने अजरामर केलेल्या ऐतिहासिक कादंबरी स्वामी,राधेय,पावनखिंड,लक्ष्यवेध या कादंबरी वाचते वेळी आपण त्यानुसत्या वाचत नाही तर त्या अनुभवतो आहे असा भास होतो.  श्रीमानयोगी या कादंबरी द्वारे संपुर्ण शिवचरित्र वाचकांन समारो उभे केले. ते वाचते वेळी आपण त्या प्रत्येक क्षणांचे साक्षीदार आहोत असाच भास होत रहातो. कथे मधील बारकावे, घडणाऱ्या घटने सोबत प्रसंगांची निर्मिती, परिस्थीचे आणि अजु बाजुच्या परिसराचे वर्णन,  कथे मधील पात्रांचे वर्णन येवढेच काय तर त्या पात्रांच्या पोशाखाचे वर्णन हे सुद्धा वाचुन मन भरून जाते. एकदा वाचायला सुरु केलेली कादंबरी संपवल्या शिवाय खाली ठेवुस वाटत नाही. लेखक रणजित देसाई यांच्या लेखणी विषयी बोलावे आणि लिहावे तेवढे कमीच आहे. म्हणुन थोडं थांबतो इथे.

तर मित्रहो आज १९ फेब्रुवारी आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. या जयंती निमित्य आदिम महासागर असणाऱ्या शिवचरित्रामधील एक महत्वाची घटना, ज्याने शिवरायांच्या आणि हिंदवी स्वराज्याच्या प्रवासाला मिळालेलं एक यशस्वी वळण. ती घटना म्हणजे अफझलखानचा वध. या प्रसंगावर आधारीत कादंबरी लेखक रणजित देसाई लिखित लक्षवेध हि कादंबरी घेऊन  मी तुमच्या भेटीला आलो आहे.  या आधी खुप पुस्तकं विषयी लिहिलं,  मुळ कथेचा गाभा किंवा मुळ कथेचा उलघडा न करता पुस्तकाचा परिचय आपल्या समोर मांडला आणि मांडत आलो,  त्यावेळी उद्धेश एकच होता कि तुम्ही ते पुस्तक वाचावे आणि तुम्हाला ते पुस्तक वाचावयास भाग पाडणे. पण यावेळी मी थोडा संकटात आहे कारण आता जे पुस्तक घेऊन मी तुमच्या भेटीला आलो आहे त्याची कथा तर तुम्हाला आधी पासुन माहिती आहे. किंबहुना ती कथा आपल्याला इयत्ता चौथी मध्ये शिकवली आहे. मग तुम्ही म्हणाल हि घटना आम्हाला आधी पासुन माहिती आहे मग आम्ही हे पुस्तक का वाचु ...?

तर मंडळी या प्रश्नच उत्तर मी असं देईन कि ऐतिहासिक घटनांची मांडणी करताना किंवा इतिहास सांगताना मुळ कथेला धक्का न  लावता, मुळ कथेला पुर्ण पणे न्याय देऊन, सर्व घटनांचा तपशील त्यांच क्रम योग्ये प्रमाणे मांडावा म्हणजे मुळ इतिहास हा लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहचतो. घडलेली घटना पुढच्या पिढीला सांगताना त्यामध्ये काही कमी जात होतं पण ते किती कमी आणि किती जास्त करायचं हे त्या इतिहासकाराला, त्या लेखकाला यांची जाणीव असावी. आणि हिच जाणीव लेखक रणजित देसाई यांना आहे.  त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक अत्यंत प्रभावी आहे.  अफझलखानचा वध हि मुळ घटना असली तरी त्यासोबतची पार्श्वभुमी त्यांच्या सोबतच्या इतर घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई मातोश्री यांचा आजाराने झालेला मृत्यु. त्यावेळी शिवरायांची झालेली मनःस्तिथी हि ज्याप्रकारे लेखकानी  मांडली आहे ती वाचतेवेळी डोळ्यात पाणी येते. बलाढ्य शक्ती असलेल्या अफझलखानाला शिवरायांनी बुद्धीच्या जोरावर मात दिली या संपुर्ण घटनेचा घटना क्रम वाचते वेळी उर अभिमानाने भरून येते आणि न कळत तोंडातुन शब्द येतात शक्ती पेक्षा युक्ती क्ष्रेष्ठ. यासर्व गोष्टींसोबत कथेमध्ये येणाऱ्या इतर व्यक्ती रेखा म्हणजे जीव महाला,संभाजी कावजी, महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ,कृष्णाजी भास्कर,सय्यद बंडा या आणि इतरांचे केलेले वर्णन वाचते वेळी यासर्व व्यक्ती रेखा डोळ्या समोर उभ्या रहातात. अफझलखानचे केले वर्णन वाचुन अफझलखान किती शक्तिशाली होता याचा अनुभव येतो. मडंळी या पुस्तकांमधील अशा खुप गोष्टी आहेत ज्यांच्या विषयी बोलावे तेवढे कमी आहे. माझ्या मते तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला मी योग्य उत्तर दिला आहे. आणि माझ्या या उत्तराने तुमचे समाधान झाले नसेल तर हि कादंबरी तुम्ही नक्की वाचा. मंडळी मी या कथेचा मुळ गाभा सांगितलंच नाही आणि तो कोणता माहिती आहे......मग तर हे पुस्तक तुम्ही वाचलेच पाहिजेल. मुळात मंडळी हे पुस्तक १३५ पानाचे आहे. आणि हे मी पुणे ते कोल्हापुर या साडेपाच तासाच्या प्रवास मध्ये वाचुन पुर्ण केले आहे.

पुस्तकाचे प्रकाशन मेहता पब्लिकेशन हाऊस यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी साकारले आहे. अत्यंत वाचनीय आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही हे पुस्तक असलेच पाहिजेल. प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक स्वामीकर लेखक रणजित देसाई लिखित लक्षवेध.

 आता तर टीव्ही मालिकांमधुन, सिनेमांमधुन शिवचरित्र दृश्य स्वरूपामध्ये लोकांसमोर मांडले जात आहे. यागोष्टीचा खुप अभिमान वाटतो. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तळागाळातीलच नव्हे तर संपुर्ण विश्वातील, प्रत्येक स्थरामधील लोकांना तो समजत आहे. माझा राजा हा नुसता राजा नव्हता तर तो जनतेचा राजा होता, म्हणुन लोक त्यांना जाणता राजा म्हणतात. माझी इच्छा फक्त एवढीच आहे. शिवरायांचा इतिहास पद्यावर मांडते वेळी प्रत्येक दिग्दर्शकाने आणि लेखकाने एकदा तरी रणजित देसाई यांनी लिहिलेल्या मी वरती नमुद केलेली सर्व पुस्तके वाचावे. म्हणजे मुळ इतिहासाला धक्का न लावता तो लोकांसमोर कसा मांडावा याचे आकलन होईल.

जय शिवाजी जय भवानी.


श्रीजीवन तोंदले

1 comment:

  1. खूप मस्त सारांश श्री...पुस्तक खरेदी करायला भाग पाडलं तू मला..👍

    ReplyDelete

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.