Monday, March 16, 2020

बाजी प्रभु देशपांडे यांच्या शौर्याने पावन झालेली गजाखिंडेची....पावनखिंड





पावनखिंड

                                             लेखक -  रणजित देसाई


   महाराष्ट्रामधील प्रत्येकाला मग तो कोणीही असो, प्रत्येक स्थरामधील व्यक्तीला एक गाथा,एक चरित्र प्रभावी वाटतं, त्याकडे प्रत्येक जण आकर्षित होतो,त्यापासुन प्रेरणा घेतो, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र.  शिवचरित्र म्हणजे अखंड आदिम महासागर. ओंजळ भर काढले काय आणि हंडा भर काढले काय तरीही कमीच वाटणारे. त्यामधील प्रत्येक घटना,प्रत्येक प्रसंग म्हणजे एक स्वतंत्र पुस्तकच. संपुर्ण शिवचरित्र हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणा देणारे स्रोत. शिवरायांचा जन्म, आपल्या सवंगड्यां सोबत रोहिडेश्वराला साक्ष ठेऊन हिंदवी स्वराज्याची घेतलेली शपत, सोळाव्या वर्षी घेतलेला तोरणा गड, अफझलखाणाच्या रूपाने स्वराज्यावर आलेलं सर्वात मोठं संकट, पावनखिंडीतील शौर्य गाथा, महाराजांची आग्रयाहून सुटका,  स्वराज्यामध्ये परत मिळवलेला कोंडाणा किल्ला(सिह गड) या आणि अशा किती तरी घटनांनी शिवचरित्र हे एक अखंड,आदिम महासारग बनलं आहे. म्हणुन वर म्हंटल्या प्रमाणे ओंजळ भर काढलं काय आणि हंडा भर काढलं काय तरीही ते कमीच वाटावं.

आपल्या महाराष्ट्रामध्ये  आणि मराठी साहित्यविश्वामध्ये खुप इतिहासकार होऊन गेले आणि होत आहेत. प्रत्येक जण आपल्यापरीने शिवचरित्र लोकांसमोर मांडत आहेत. त्याचा प्रसार करत आहेत. आज पर्यंत खुप इतिहासकारांनी शिवरायांचा इतिहास कादंबरीच्या माध्यमातुन मांडला त्यामध्ये प्रामुख्याने नाव घ्याचे तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे. सोबतच एक नाव आवर्जुन घावे ते म्हणजे स्वामीकर रणजित देसाई यांचे.लेखक रणजित देसाई यांच्या लेखणीने अजरामर केलेल्या ऐतिहासिक कादंबरी स्वामी,राधेय,पावनखिंड,लक्ष्यवेध या कादंबरी वाचते वेळी आपण त्यानुसत्या वाचत नाही तर त्या अनुभवतो आहे असा भास होतो.  श्रीमानयोगी या कादंबरी द्वारे संपुर्ण शिवचरित्र वाचकांन समारो उभे केले.कथे मधील बारकावे, घडणाऱ्या घटने सोबत प्रसंगांची निर्मिती, परिस्थीचे आणि अजु बाजुच्या परिसराचे वर्णन,  कथे मधील पात्रांचे वर्णन येवढेच काय तर त्या पात्रांच्या पोशाखाचे वर्णन हे सुद्धा वाचुन मन फुलुन जाते. एकदा वाचायला सुरु केलेली कादंबरी संपवल्या शिवाय खाली ठेवुस वाटत नाही.

मित्रहो १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी आम्ही आदिम महासागर असणाऱ्या शिवचरित्रामधील एक महत्वाची घटना, ज्याने शिवरायांच्या आणि हिंदवी स्वराज्याला यशाच्या दिशा मिळाली. ती घटना म्हणजे अफझलखानचा वध. महाराजांचा परिपत्यासाठी आदिलशाहीने अफझलखानासोबत मोठी फौज पाठवली होती. त्या बलाढ्य फौजेचा आणि बलाढ्य शक्तीच्या अफझलखानाचा पराभव झाला. या पराभवाने गाफील राहिलेल्या शत्रुचे एक एक गड किल्ले शिवरायांनी स्वराज्यात घेतले. त्यासर्व किल्ल्यांमध्ये पन्हाळ गड हा एक. नंतर महाराजांच्या पराभवासाठी आदिलशाहीने सिद्दी जौहर,रुस्तुमेजमा, अफझलखानाचा मुलगा फाझलखान यांना आणि यांच्या सोबत मोठा फौज-फाटा देऊन पाठवले. यानंतर ची गोष्ट मंडळी तुम्हाला माहितीच आहे. या प्रसंगावर आधारीत कादंबरी लेखक रणजित देसाई लिखित पावनखिंड हि कादंबरी घेऊन  मी तुमच्या भेटीला आलो आहे. पुस्तक परिचय लिहिते वेळी माझा नेहमीचा एकच उद्धेश असतो, तुम्ही ते पुस्तक वाचावे आणि तुम्हाला ते पुस्तक वाचावयास भाग पाडणे. पण यावेळी मी परत संकटात आलो आहे कारण याही पुस्तकाची कथा तुम्हाला माहिती आहे.

तर मंडळी मागील पुस्तकाच्या परिचयामध्ये म्हंटल्या प्रमाणे, ऐतिहासिक घटनांची मांडणी करताना किंवा इतिहास सांगताना मुळ कथेला धक्का न  लावता, मुळ कथेला पुर्ण पणे न्याय देऊन, सर्व घटनांचा तपशील त्यांच क्रम योग्ये प्रमाणे मांडावा म्हणजे मुळ इतिहास हा लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहचतो. घडलेली घटना पुढच्या पिढीला सांगताना त्यामध्ये काही कमी जात होतं पण ते किती कमी आणि किती जास्त करायचं हे त्या इतिहासकाराला, त्या लेखकाला यांची जाणीव असावी. आणि हिच जाणीव लेखक रणजित देसाई यांना आहे. मुळचे कोल्हापुरचे असलेले लेखक रणजित देसाई यांना पन्हाळा गडाविषयी खुप ओढ आहे. ज्या पद्धतीने त्यांनी हि कादंबरी लिहिली आहे, पन्हाळा गडाचे केलेले वर्णन वाचते वेळी सहज समजुन येते कि एक भुमी पुत्रच असे लिहु शकतो.

तर मंडळी पावनखिंड या पुस्तकाची कथा फक्त बाजीप्रभु देशपांडे यांच्या शौर्य सांगणारी नाही आहे तर या घटनेच्या आधीची संपुर्ण पार्श्वभुमी सांगणारी आहे. मग त्यामध्ये बाजीप्रभु देशपांडे यांची संपुर्ण कहाणी आहे,बांदल-देशमुख यांच्या सोबत महाराजांनी केलेल युद्ध,अफझलखानचा पराभव तेव्हा बाजीप्रभु देशपांडे यांनी निभावलेली प्रमुख भुमिका, त्यानंतर जराशीही उसंत न घेता राजेंनी जिंकलेले गड-किल्ले, जासलोड गडाचे बांधकाम आणि त्यादरम्यान सापडलेला खजिना,सिद्दी ने पन्हाळ गडाला दिलेला वेढा,शिव काशीद याची महत्वाची भुमिका या आणि अशा कितीतरी गोष्टी या पुस्तकामध्ये आहेत. त्यासोबत बाजीप्रभु देशपांडे यांच्या ताकदीचे केलेले वर्णन वाचते वेळी न काळात बाजींचा ढीपाड देह डोळ्यांसमोर उभा राहतो. या सोबतच अजुन खुप अशा गोष्टी यामध्ये आहेत ज्याने छत्रपती शिवरायांची दुरदृष्टी,युद्धनीती,प्रसंगावधान आणि त्यांचे हळवे रूप जे आपल्या प्रत्येक शिलेदारांच्या शौर्यासाठी, त्यांनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानासाठी त्याचे हळहळणारे मन यासर्व गोष्टी वाचते वेळी मन भरून येते. यासर्व गोष्टी लेखक रणजित देसाई यांनी अत्यंत उत्तम प्रकारे मांडल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तकं संपुर्ण वाचुन खाली ठेवता येत नाही. आणि मंडळी हे १५८ पानांचे पुस्तक मी कोल्हापुर ते पुणे या पाच तासाच्या प्रवासामध्ये वाचुन पुर्ण केले आहे.

 पुस्तकाचे प्रकाशन मेहता पब्लिकेशन हाऊस यांनी केले आहे. पुस्तकाचे सुरेख मुखपृष्ठ रवी मिस्त्री यांनी साकारले आहे. अत्यंत वाचनीय आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही हे पुस्तक असलेच पाहिजेल. आई अंबाबाईच्या आशीर्वादाने पवित्र झालेल्या कोल्हापुरच्या भुमी वर घडलेल्या या घटनेचे, बाजीप्रभु देशपांडे यांच्या शौर्याची गाथा सांगणारे पुस्तक स्वामीकर लेखक रणजित देसाई लिखित पावनखिंड.

 आता तर टीव्ही मालिकांमधुन, सिनेमांमधुन शिवचरित्र दृश्य स्वरूपामध्ये लोकांसमोर मांडले जात आहे. यागोष्टीचा खुप अभिमान वाटतो. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तळागाळातीलच नव्हे तर संपुर्ण विश्वातील, प्रत्येक स्थरामधील लोकांना तो समजत आहे. माझा राजा हा नुसता राजा नव्हता तर तो जनतेचा राजा होता, म्हणुन लोक त्यांना जाणता राजा म्हणतात. माझी इच्छा फक्त एवढीच आहे. शिवरायांचा इतिहास पद्यावर मांडते वेळी प्रत्येक दिग्दर्शकाने आणि लेखकाने एकदा तरी रणजित देसाई यांनी लिहिलेल्या मी वरती नमुद केलेली सर्व पुस्तके वाचावे. म्हणजे मुळ इतिहासाला धक्का न लावता तो लोकांसमोर कसा मांडावा याचे आकलन होईल.


जय शिवाजी जय भवानी.


श्रीजीवन तोंदले

No comments:

Post a Comment

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.