भावनिक नात्यांचं सायड
सायड
लेखक - रवींद्र पांढरे
जन्माला आलेली प्रत्येक गोष्ट नश्वर
असते, हा सृष्टीचा नियमच आहे. बियाणे
मातीमध्ये रुजते, त्याला कोंब येतो, त्याचे छोट्या रोपट्यामध्ये रूपांतर
होते, ते बहरू लागते आणि मग कालांतराने
त्यांची पानझड होते. असेच काहीसे मानवी जीवनाचे आहे. माणसाच्या आयुष्यात कितीही सुखाचे
क्षण आले, तरी कधी ना कधी परत त्याला त्या
दुःखाच्या क्षणांचा सामना करावाच लागतो. प्रत्येक बहराच्या नशिबी पानगळ ही
लिहिलेली असते. याच गोष्टीला समर्पक असणारे पुस्तक घेऊन मी आज तुमच्या भेटीला आलो
आहे. मी बोलत आहे लेखक रवींद्र पांढरे लिखित 'सायड' या पुस्तकाबद्दल!
१३७ पानाच्या या पुस्तकाची कथा जामनेरी
बोलीतील आहे. 'सायड' या शब्दाचा अर्थ दोन शेतकऱ्यांनी एकमेकांच्या मदतीने मिळून आपल्या
शेतीची मशागत करून घेणे, असा होतो. ग्रामीण भागामध्ये अशी
देवाणघेवाण ही सुरूच असते. कधी ती औत फाट्याची असते, तर कधी माणुसकीची, तर कधी नात्यांची, भावनिक आधाराची देवाण घेवाण सुरूच असते. कथेचा नायक यशवंत
कासाबयोच्या घरासोबत सायड करतो. यशवंता एक सधन शेतकरी; पण संसाराचे सुख त्याच्या पदरी नाही!
कासाबयो या म्हातारीचा दत्तक घेतलेला तरुण मुलगा आजारामुळे अंथरुणाला खिळून आहे.
त्यामुळे म्हातारीसमोर शेताची आणि सोबतच या लेकाच्या संसाराची काळजी आहे.
कासाबायोची सून शांता आणि यशवंता हे दोघे या सायडच्या निमित्ताने जवळ येतात.
यशवंताला शांतीकडून बायकोचे आणि शांतीला यशवंताकडून नवऱ्याचे सुख मिळत जाते. पण
सरते शेवटी त्या दोघांना एका वास्तवाला सामोरे जावे लागते, ज्यामुळे दोघांच्यामधे एक दरी निर्माण
होते.
पुस्तकातील कथेमध्ये अजिंठ्याच्या
लेण्यांचे वर्णन आणि तेथील सृष्टीवैभवाचे दर्शन आपल्याला वाचायला मिळते. अत्यंत
योग्य शब्दांमध्ये लेखकाने हे वर्णन मांडले आहे, ज्यामुळे वाचकाला या पुस्तकाच्या माध्यमातून अजिंठा लेणीचेच दर्शन
होते. कथेमध्ये यशवंता आणि सायबू या समदुःखी मित्रांची मैत्री मांडतेवेळी लेखकाने
या दोघांमधील संवादाच्या माध्यमातून संसारामध्ये बायकोचे किती अविभाज्य महत्त्व
आहे, हे खूप छान पद्धतीने मांडले आहे. बायको
शिवाय घर नाही आणि बायको शिवाय संसार नाही. बायको हा नवऱ्याच्या मनाचा आधार असतो.
नवरा कितीही खंबीर असो! त्याला साथ देणारी त्याची हक्काची पार्टनर बायको ही
लागतेच. अशा पद्धतीचे लिखाण या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळते.
ग्रामीण साहित्य हे नेहमी वाचकाला
आपल्याकडे आकर्षित करते ते त्याच्या कथेमुळे, सभोवतीच्या परिसराच्या वर्णनाने आणि त्याच्या भाषेमुळे! या पुस्तकाची
जमेची बाजू म्हणजे या पुस्तकाची जामनेरी बोली, ज्यामुळे वाचनामध्ये गोडी निर्माण होते. जामनेरी बोलीचा लहेजा, बोलण्याचा ढंग वाचकाच्या तोंडी येतो.
त्यामुळे वाचक पुस्तकाकडे ओढला जातो.
पुस्तकाचे प्रकाशन रोहन प्रकाशन यांनी
केले आहे. वाचकांना अशा प्रकारची उत्तमोत्तम पुस्तके वाचायला मिळावीत म्हणून रोहन
प्रकाशन सदैव प्रयत्नशील असतात. रोहन प्रकाशन यांची वेगळी गोष्ट म्हणजे त्यांनी
त्यांच्या पुस्तकाची ओळख वाचकांना व्हावी म्हणून निर्माण केलेल्या मुद्रा!
उदाहरणार्थ- सायड या पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये मोहर ही
मुद्रा बघायला मिळते. मोहर या मुद्रेचा अर्थ असा, की मोहर या मुद्रे अंतर्गत फिक्शन आणि ललित साहित्य येते. अशा
प्रकारच्या अन्य काही मुद्रा आहेत. समाजरंग- ज्यामध्ये सामाजिक विषय, व्यक्तिरंग- ज्यामध्ये आत्मचरित्र, आणि किशोर- ज्यामध्ये किशोर वयातील
वाचकांसाठीचे साहित्य येते. रोहन प्रकाशनाच्या या वेगळेपणामुळे वाचकांच्या मनात ते
आपली जागा निर्माण करत आहेत. वाचकांच्या मनामध्ये आपले स्थान निर्माण करण्यामध्ये
संपूर्ण टीमचे मनापासून प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या या वाटचालीस आमच्या
शुभेच्छा. पुस्तकाचे मुखपृष्ठ अन्वर हुसेन यांनी केले आहे. प्रत्येक वाचकाने
वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक!
लेखक रवींद्र पांढरे लिखित 'सायड'
जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर click करा
https://rohanprakashan.com/product/saayad/
रोहन प्रकाशन यांच्या इतर दर्जेदार पुस्तकांसाठी आणि माहितीसाठी click करा.
खूप सुंदर लिहल आहे. 👌👌
ReplyDeleteखुप छान लिहिले आहे. आणि अजून लिहत रहा.
ReplyDeleteछान आहे. लिहीत रहा
ReplyDelete