Sunday, March 26, 2023

समाजाने वेशीबाहेर ढकललेल्या एका अन्यायग्रस्त जमातीच्या उत्कर्षासाठी झटणाऱ्या एका कार्यकर्त्याने मांडलेली ही कैफियत आहे......

 




पारधी

                                                         लेखक - गिरीश प्रभुणे

 

 आज आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे ७५ वर्ष साजरे करत असलो तरीही, आपला देश जाती धर्माच्या अतूट विळख्यामध्ये अडकला आहे. जेथे समाजासमोर बेरोजगारी, महागाई सारख्या मोठ्या समस्या असताना सुद्धा जाती धर्माला जास्त महत्व दिलं जात आहे. अशा विदारक परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या आजू बाजूला असे काही लोक आहेत जे मानवतेवर, मनुष्य धर्मावर विश्वास ठेवणारे आहेत. जाती-धर्माला न महत्व देता ते समाजासाठी काम करत आहेत. समाजामधील तळागाळातील लोकांसाठी, त्यांच्या हक्कासाठी, त्यांना मूलभूत सेवा-सुविधा मिळाव्या यासाठी कोणत्याही पद्धतीचा स्वार्थ हेतून न बाळगता ते स्वतःचे आयुष्य खर्ची करत आहेत. कोणत्याही फळाच्या अपेक्षे शिवाय. अशा लोकांपैकी एक नाव आवर्जून घेतले पाहिजे ते म्हणजे आदरणीय पद्मश्री गिरीश प्रभुणे (प्रभुणे काका).

नमस्कार मंडळ, मी आज एक असं पुस्तक घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे, जे फक्त एक आत्मचरित्र नसून ते त्या व्यक्तीचा, त्यांनी केलेल्या कार्याचा प्रवास सांगणारे आहे. मी बोलत आहे, लेखक गिरीश प्रभुणे लिखित पारधी या पुस्तकाविषयी. ३८८ पानांच्या या पुस्तकाच्या माध्यमातून लेखक गिरीश प्रभुणे यांनी पारधी समाजासाठी केलेल्या अमूल्य कामाचा, पारधी समाजाच्या हक्कांसाठी, त्यांच्या होणाऱ्या अन्यायाविरुद्ध केलेल्या संघर्षाचा प्रवास ते वाचकां समोर मांडत आहेत. चळवळीच्या माध्यमातून काम करतेवेळी लेखकाने पारधी समाज जवळून पाहिला, समजून घेतला तो या पुस्तकामध्ये शब्दांच्या माध्यमातून मांडला असं म्हंटलं तरी चुकीचं ठरणार नाही. 

पारधी या समाजाने शिवरायांच्या स्वराज्य उभारणीमध्ये आपले योगदान दिले होते. पारधी हा समाज(जात) निष्ठावान म्हणून ओळखली जात होती. या समाजाने आपल्या देशाच्या स्वातंत्र लढ्यामध्ये भाग घेतला, शिवरायांच्या गनिमी कावा या तंत्राने त्यांनी इंग्रजांशी झुंज दिली. या लोकांना पकडणे इंग्रजांसाठी अशक्य होते. म्हणून इंग्रज सरकारने या समाजाला चोर-दरोडेखोर म्हणून घोषित केले. तेव्हा पासून ते देशाला स्वातंत्र मिळून ५०-६० वर्षे होऊन सुद्धा हा समाज मूळ प्रवाहामध्ये सामील होऊ शकला नाही. समाजातील मुख्य घटकातील लोकांकडून, पोलीसांकडून या समाजावर वेळोवेळी अन्याय होत गेले. त्यापैकी काही घटनांचे वर्णन या पुस्तकांमध्ये आहे. ते वाचते वेळी मन सुन्न होऊन जाते. सदैव परागंदा असणाऱ्या या समाजाला स्वतःचे घर नव्हते कि स्वतःच असं गाव नव्हते. उदरनिर्वाहाचं साधन म्हणून या लोकांनी चोरी हा मार्ग पत्करला. शिकारीच्या वाटणीसाठी, बायको-मुलांसाठी भांडणारी ही लोकं एकमेकांचा खून पाडत, क्रूरपणे हत्या करून दरोडा घालणाऱ्या यालोकांना मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी, त्यांना स्वतंत्र-समता-बंधुता या गोष्टी समजावून देण्यासाठी, त्यांना सुखकर आयुष्य देण्यासाठी लेखक गिरीश प्रभुणे यांनी समरस्ताच्या माध्यमातून ही चळवळ उभी केली. यमगरवाडी, मगर सांगावी या प्रकल्पाच्या माध्यमातून या समाजाला रोजगार, राहायला स्वतःच घर आणि त्याच्या मुलांसाठी योग्य शिक्षण यासर्व सुविधा मिळवून दिला. हे सगळं त्यांनी निस्वार्थीपणाने केलं. हे सर्व करताना प्रभुणे यांना खूप अडचणी आल्या कधी शासन व्यवस्थेकडून तर कधी खुद्ध पारधी लोकांकडून. न डगमता, न खचता ते सदैव लढत राहिले. वडार, कैकाडी, डवरी गोसावी, गोंधळी, डोंबारी, कोल्हाटी, लंबाडी आणि पोथुराजू या समाजासाठी सुद्धा त्यांनी काम केलं. त्यांच्या या कार्यामध्ये त्यांना खूप लोकांची मदत मिळाली. यासोबतच या चळवळीच्या माध्यमातून काही नवीन कार्यकर्ते त्यांनी तयार केले, जे पुढे जाऊन त्यांच्या सोबत काम करू लागले.

प्रभुणे सरांचा हा प्रवास प्रत्येकाला भारावून टाकणारा आहे. जाती भेदाच्या भिंती मोडून, समाजातील एका वर्गाला मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठीचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे यात शंका नाही. या पुस्तकाचे प्रकाशन राजहंस प्रकाशन यांनी केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि पुस्तकातील रेखाटने ज्यामुळे प्रत्येक प्रसंगाचे गांभीर्य समजून येते. ते केले आहे बाळ ठाकूर यांनी. प्रत्येक व्यक्तीने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक लेखक, पद्मश्री गिरीश प्रभुणे लिखित पारधी.

No comments:

Post a Comment

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.