Sunday, September 13, 2020

जैविक व रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य इतिहास सांगणारे पुस्तक


 


युद्ध जिवांचे

जैविक व रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य इतिहास.

 

                                 लेखक - गिरीश कुबेर

 

शत्रूच्या सैन्याला प्रत्यक्ष युद्धभूमीमध्ये शस्त्रांच्या मदतीशिवाय ठार मारता येते,ते सुद्धा प्रत्यक्ष युद्धभूमीवर न जात. सर्व गोष्टी सुरळीत पणे सुरु असतात आणि अचानक काही बिघाड होतो (मी बिघाड म्हणतो आहे बदल नाही हा ). दिनक्रम सुरळित सुरू असलेला माणूस अचानक आजारी पडतो. सुरवातीला आपण याआजारपणाकडे वातावरणातील बदल म्हणून दुर्लक्ष करतो. पण हा एखाद्या जैविक अस्त्राचा परिणाम असू शकतो का असा विचार आपण करत नाही. आणि खरंच तसे असेल तर....? जैविक अस्त्रांच्या मदतीने आपल्या सैन्याची जीवितहानी न होता युद्ध जिंकता येते असा इतिहास आहे.

नमस्कार मित्रांनो, आज एक असं पुस्तक घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे जे सांगेल जैविक व रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य इतिहास आणि त्याची भीषणता. लेखक गिरीश कुबेर लिखित युद्ध जीवांचे या पुस्तकाविषयी मी बोलत आहे. या आधी  लेखक गिरीश कुबेर यांचे एका तेलियाने आणि हा तेल नावाचा इतिहास आहे ही पुस्तके वाचली होती. त्यासोबतच दैनिक लोकसत्तामध्ये त्यांनी लिहिलेले अग्रलेख न चुकता वाचत होतो. लेखकाचे प्रत्येक विषयांमधील सखोल ज्ञान हे कौतुक करण्यासारखे आहे. विषयाची मांडणी, लेखन शैली, शब्द मांडणी या सगळ्यांमुळे वाचकाला त्या विषयाचे आकलन होते. शब्दांची मांडणी ही इतकी साधी असते की विषय लगेच समजतो. अशाच उत्तम मांडणीचे उदाहरणं युद्ध जीवांचे हे पुस्तक.

२२२ पानांच्या या पुस्तकामध्ये तब्बल १६ प्रकरणांद्वारे लेखकाने जगामधील जैविक व रासायनिक युद्धाचा इतिहास सखोलपणे मांडला आहे. अगदी इसवीसनपूर्व काळापासून ते आता पर्यंत. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनी, रशिया, अमेरिका, इंगलंड, फ्रान्स यासारख्या देशांनी कशा प्रकारे जैविक आणि रासायनिक शस्त्रांचा वापर केला त्याबद्धल लेखकाने सखोल विश्लेषण केले आहे. रशियाने चीनवर केलेल्या अमानुष अत्याचार, अमेरिकेने केलेल्या नापाम बाँम्ब हल्यात अभागी ठरलेले व्हिएतनाम आणि यासोबत अशा जैविक आणि रासायनिक शास्त्रांच्या बळी पडलेल्या लोकांचे केलेले वर्णन वाचून मन सुन्न होऊन जाते. त्यासोबतच आचार्य रजनीश, शोको असहार यांसारख्या बाबाबुवांची दुष्कर्म या विषयी लेखकाने सखोल विश्लेषण केले आहे.ज्या ज्या देशांनी या जैविक अस्त्रांची भरमसाठ निर्मिती केली,पुढे जाऊन त्याच सगळया देशांनी त्याचा वापर करणार नाही अशी शपसुद्धा घेतली आणि ती सर्व अस्त्रे समुद्राच्या तळाशी बुडवून टाकली.

सरते शेवटी पुस्तकांमधील काही ओळी मला अजूनही अस्वस्थ करतात,त्या म्हणजे "तुमच्या-आमच्या आसपासचा एखादा माणूस असा अनाकनीय आजाराला बळी पडला, तर त्यामागे ही जैविक अस्त्रं किंवा त्यातला एखादा घटकही कारणीभूत असू शकतो. काळजी घ्यायला हवी. हे असे प्रकार घडू लागले आहेत." आजच्या परिस्थितीवर ज्वलंतपणे भाष्य करणाऱ्या या ओळी आहेत ना....?

पुस्तकाचे प्रकाशन 'राजहंस प्रकाशनने'केले आहे. राजहंस प्रकाशनाचे नाव घेताच वाचकाला आपोआपच पुस्तकाच्या उत्तम दर्जाची शाश्वती मिळते. वाचकांना उत्तमोत्तम पुस्तके वाचायला मिळावीत म्हणून ते नेहमीच प्रयत्नशील असतात.पुस्तकाचे मुखपृष्ठ हे पुस्तकाच्या विषयाला साजेसे आहे आणि ते साकारले आहे कमल शेडगे यांनी. प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचावे आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे पुस्तक लेखक गिरीश कुबेर लिखित युद्ध जिवांचे.



श्रीजीवन तोंदले


1 comment:

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.