Sunday, July 19, 2020

महात्मा गांधी हे द्वेष करण्यासाठी नाही आहेत तर त्यांनी शिकवलेली सुंदर जीवनमूल्ये आत्मसात करण्यासाठी आहेत.






गांधी का मरत नाही ?


लेखक- चंद्रकांत वानखडे

 

माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग म्हणजे पुस्तकं. पुस्तकांमुळे माझं आयुष्य समृद्ध झाले. खऱ्या अर्थाने मी विचारांनी,बोलण्याने,स्वभावाने आणि मनाने समृद्ध झालो ते फक्त पुस्तकांमुळे. आता पर्यंत खूप पुस्तकं वाचली. त्यामधून खूप काही शिकायला मिळाले. प्रत्येक गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची दृष्टी प्राप्त झाली. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात,एक चांगली आणि दुसरी वाईट. पण बघणारा कोणत्या हेतूने बघतोय आणि त्याचा हेतू चांगला आहे की वाईट त्यावर हेठरते.आपल्या भारत देशाला खूप मोठा इतिहास आहे. मग तो पौराणिक असो राजकीय वा शूरवीरलढ्वय्यांचा.भारतीयस्वातंत्र्य लढ्याचा इतिहास बघितला तर तो खूप मोठा आहे. २०० वर्षाहून अधिक काळ आपण इंग्रजांशी झगडा केला आपल्या स्वातंत्र्यासाठी. या स्वातंत्र्य  प्राप्तीच्या लढ्यामध्ये आपल्या देशाला अनेक महापुरुष मिळाले. ज्यांनी वेळ प्रसंगी आल्या प्राणांची आहुतीसुद्धा दिली.त्यांची ही असीम देश भक्ती आज आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरते. मंगल पांडे, चंद्रशेखर आझाद, भगत सिंग, सुखदेव, राजगुरु, लोकमान्य टिळक, स्वा.सावरकर, सरदार पटेल,नेहरू जेवढी नावे घेऊ तेवढी कमीच आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यामधील या सर्व महापुरुषांमध्ये एक नाव खूप महत्वाचे आहे. ते म्हणजे मोहनदास करमचंद गांधी. महात्मा गांधी,राष्ट्रपिता गांधी......

नमस्कार मंडळी,आज एक असं पुस्तक घेऊन आलो आहे; जे तुम्हाला सांगेलकी प्रत्येक गोष्टीच्या जरी दोन बाजू असल्या तरी.(वर नमूद केल्याप्रमाणे चांगली आणि वाईट). पण हे पुस्तक तुम्हाला सांगेल की लोक आपल्या स्वार्थी वृत्तीमुळे,आपल्या वाटेमध्ये कोणी येत असेल तर त्याला बाजूला करण्यासाठी त्याच्या विषयी वाईट गोष्टी आपल्या कुजबुज मोहिमेद्वारे समाजामध्ये पसरव्याच्या आणि त्याची बदनामी करायची.आत हे सर्व पहिल्या पासून गांधींच्या वाट्याला आलं आहे.यासर्वांच्या पलीकडे जाऊन खरे महात्मा गांधी जाणून घ्यायचे असतील तर चंद्रकांत वानखडे लिखित गांधी का मरत नाही ? हे पुस्तक वाचलंच पाहिजे.

१६६ पानांच्या या पुस्तकामधून मोहनदास करमचंद गांधी यांचा राष्ट्रपिता गांधी, महात्मा गांधी पर्यंतचा प्रवास लेखकाने अत्यंत वेगळ्या पद्धतीने मांडला आहे. सूटाबूटातील बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी ते पंचातले महात्मा गांधी हा प्रवास जगाला थरारून सोडणार आहे.  स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आज पर्यंत गांधीजींची बदनामी करणाऱ्या लोकांचा लेखकाने समाचार घेतला आहे. पुस्तक वाचायला सुरवात करण्याआधी पुस्तक वाचकाला आकर्षित करते ते त्याच्या प्रस्तावनेमुळे. लेखकाने सुरवातीलाच म्हंटले आहे की"स्वातंत्र्य रेड़ीमेड पदरात पडलेल्या पिढीचा मी प्रतिनिधी आहे." आणि हे खरे आहे;माझ्यासारखे जे स्वातंत्र्य रेडीमेड घेऊन जन्माला आले त्यांना क्रांती,चळवळ,आंदोलन आणि वेळ प्रसंगी लाठ्यासुद्धा खाव्या लागतात हे माहिती नसेल. पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखक हे पुस्तक लिहिण्याचे उद्दिष्टं  स्पष्ट करतो.

चित्तपावन ब्राम्हणाच्या हातून ब्रिटिशांनी सत्ता मिळविली तर ती सत्ता चित्तपावन ब्राह्मणांनीच परत मिळवली पाहिजे व भोगली पाहिजे. गांधीपूर्वीच्या भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या लढ्याची परिस्थिती अशी होती. गांधी काही पहिल्यापासून थोरपुरुष म्हणून जन्माला आले नव्हते. एक सामान्य व्यक्ती, बॅरिस्टर होऊन भारतात परतलेला,वकिलीतील पडेल ते काम करणारे, उदा. मसुदा लेखनाचे काम. पण मोहनदास करमचंद गांधींचे महात्मा गांधी झाले ते १९१५ साली दक्षिण आफ्रिकेतून परत आले तेव्हा. स्वातंत्र्य प्राप्तीच्या लढ्यामध्ये उडी घेत गांधींनी स्वातंत्र्याची व्याख्याच बदलली. स्वातंत्र्य कशासाठी व कोणासाठी तर या देशातल्या शेवटच्या माणसासाठी,शेतकऱ्यांसाठी,कष्टकऱ्यांसाठी व त्यांच्या सुखासाठी. ही त्यांची स्वातंत्र्याची व्याख्या. आता त्यांची ही व्याख्या काही लोकांना पटली नाही आणि ते काही लोक म्हणजे कोण हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

गांधी मुस्लिमधार्जिणे होते,सुभाषचंद्र बोस आणि गांधी हाडवैरी होते या आणि मजबुरी का नाम महात्मा गांधी, गांधींची बकरी काजू आणि बदाम खातेटकल्या, भेकड या आणि अशा किती तरी वाक्यांनी आणि गोष्टींनी गांधींची बदनामी केली गेली अशा सर्वगोष्टींचा लेखक चंद्रकांत वानखडे यांनी समाचार घेतला आहे आणि ज्या ज्या सत्य गोष्टी आजपर्यंत लोकांसमोर आणल्या गेल्या नाही त्या सर्व उदाहरादाखल लोकांसमोर मांडल्या आहेत.

या पुस्तकाबद्दल लिहू तेवढं कमी आहे,कारण गांधी नावाचं विश्व वढं मोठं आहे की ते कितीही भरून घ्यावं म्हंटलं तरी कमीच पडणार. महात्मा गांधी कोण्या एका जातीचे झालेच नाहीत ते फक्त सामान्य लोकांचे झाले. कारण त्यांच्या स्वातंत्र्याची व्याख्या स्पष्ट होती;  लेखक एका प्रश्नाने कायम अस्वस्थ होतो,गांधींची हत्या १९४८ मध्ये झाली.  हत्येच्या मागची कारणे फाळणी आणि इतर दिली गेली पण १९३४ च्या दरम्यान पुण्यात त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. तेव्हाच गांधी हत्या झाली असती तर...? त्या लोकांनी गांधी हत्येची काय कारणे दिली असती ?

 गांधींचा द्वेष करणाऱ्यांनी जर नि:पक्षपातीपणे गांधींची विचारसरणी समजून घेतली असती तर स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान किती महत्वाचे आहे हे समजले असते आणि गांधींनी शिकवलेली सुंदर जीवनमूल्ये त्यांना आत्मसात करता आली असती.

पुस्तकाचे प्रकाशन 'मनोविकास प्रकाशन' यांनी केले आहे.पुस्तकाचे मुखपृष्ठ गिरीश सहस्रबुद्धे यांनी साकारले आहे. प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे आणि प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक,लेखक चंद्रकांत वानखडे लिखित गांधी का मरत नाही ?  

 


श्रीजीवन तोंदले


No comments:

Post a Comment

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.